कॅन्सरकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे डॉ. अनिल गांधी
पुणे- कॅन्सर बरा होत नाही हा समज चुकीचा आहे. काही कॅन्सर पूर्णपणे बरे होतात. जे बरे होत नाहीत त्यांना निश्चित कालावधी मिळतो, ही वैद्यक शास्त्राची किमया आहे. कॅन्सरकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे, असे मत डॉ. अनिल गांधी यांनी व्यक्त केले.
सांगलीच्या ‘सिध्दीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यशवंत तोरो यांनी लिहिलेल्या कॅन्सर : निदान, उपचार व प्रतिबंध या कॉन्टिनेन्टल प्रकाशनच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. गांधी बोलत होते.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. विश्वस्त चंद्रकांत गोडसे, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, संचालक किरण शाळिग्राम, कॉन्टिनेन्टलच्या संचालिका अमृता कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. गांधी पुढे म्हणाले, ‘कुठल्याही स्वरुपातील तंबाखुचा पुढच्या पीढ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. भावी पीढ्यांचे आरोग्य बरबाद करण्याचा कोणताही नैतिक अधिकार आपल्याला नाही. पण अज्ञानामुळे या गोष्टी घडतात. त्यामुळे तंबाखुजन्य पदार्थांच्या व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
कॅन्सर सारखे आजार होऊ नयेत यासाठी प्रतिकारशक्ती वाढण्याची गरज असते. व्यायाम, योगासने, प्राणायाम, सकस आहार, चांगली झोप व ताणतणाव मुक्त जीवन यामुळे प्रतिकारशक्ती वाढवता येते, असे मतही डॉ. गांधी यांनी व्यक्त केले.
डॉ. तोरो म्हणाले, ‘कॅन्सरग्रस्त रुग्णाला कॅन्सरसोबत जगताना नवीन आशेचा किरण दाखविणारे हे पुस्तक आहे. रुग्ण, नातेवाईक, डॉक्टरांना कॅन्सरबाबतची एकत्रित माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. कॅन्सर कसा होतो, कारणे, लक्षणे, निदान चाचण्या, उपचार पध्दती, समज-गैरसमज, प्रतिबंध उपाय, शासकीय योजना आदींचे संकलन करण्यात आले आहे.’
किरण शाळिग्राम यांनी स्वागत केले. अमृता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक भाषण केले. सविता केळकर यांनी परिचय करुन दिला. अवधूत पटवर्धन यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.