समाज परिवर्तनात सेवाभाव व समन्वयाची भूमिका महत्त्वाची – डॉ. उमराणी
पुणे-उत्तम शिक्षणातून नीतिमत्ता वाढीबरोबर रोगजार निर्मिती होते. त्यातून समाज परिवर्तन अपेक्षित असते. समाज परिवर्तन होत असताना सेवाभाव आणि समन्वयाची भूमिका महत्त्वाची असते असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. नेहरु उमराणी यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ मुंबईत रचनात्मक आणि विधायक कार्य करणार्या ‘समता परिषदे’ला प्रदान करताना डॉ. नेहरु उमराणी बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते.
समता परिषदेच्या वतीने अध्यक्ष आमदार भाई गिरकर यांनी पुरस्कार स्वीकारला. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. सामाजिक कार्यकर्ते भिकूजी तथा दादा इदाते, सोसायटीचे कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, माजी अध्यक्ष डॉ. अजित पटवर्धन, निवृत्त हवाई दल प्रमुख भूषण गोखले, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. उमराणी पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्राची वैचारिक नाडी आणि धाटणी जरा वेगळी आहे. त्यामुळे धोरणकर्त्यांचे विशेष लक्ष असते. या जडणघडणीत शाहू, ङ्गुले, आंबेडकरांच्या मूलभूत विचारांची महत्त्वाची भूमिका आहे. या विचारांबरोबर संतांची चळवळ आणि नीतिमान उद्योजकांची परंपरा आहे. या सगळ्या विचारांचे सूत्र ‘समता’ आहे. समता परिषद याच उद्देशाने कार्यरत आहे. अशा संस्थांमध्ये नवीन प्राध्यापक आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्या विद्यर्थ्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे.’
श्री. इदाते म्हणाले, ‘समन्वय व सेवा या सूत्रांचा विस्तार केल्यास समरसतेची स्थापना होते. आपल्या देशाच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक एकात्मतेचे प्र‘गटीकरण म्हणजे समरसता. देश एकात्म करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. हा मार्ग आपआपल्या काळात शोधणे आवश्यक आहे. त्यानुसार कृती करणे सामजिक परिवर्तनासाठी आवश्यक आहे.’
श्री गिरकर म्हणाले. ‘बहुजन व दलितांनी एकत्र येऊन समाजाचा विकास होईल या भावनेतून समता परिषदेचे कार्य सुरू आहे. समन्वय व सेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तन व समाज जोडण्याचे काम आम्ही करतो. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात आम्ही काम करतो. सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावीत यासाठी परिषदेच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे.’
डॉ. कुंटे म्हणाले, ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी सामाजिक जागृतीचा वसा घेऊन कार्यरत आहे. देशभक्त युवक तयार करण्याच्या ध्यासातून संस्थेचे कार्य सुरू आहे. समाजातील मागासलेल्या घटकांना बरोबर घेऊन काम करण्याची संस्थेची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत.’ डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रसन्न देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. बीएमसीसीचे उपप्राचार्य डॉ. आशीष पुराणीक यांनी परिचय करून दिला.