रेल्वेओव्हरब्रीजसाठी १० वर्षे झगडलो मी अन बोलण्याची संधी मात्र ‘त्या ‘आमदारांना – सेनेच्या माजी खासदाराची खंत (व्हिडीओ)
पुणे- घोरपडी रेल्वे ओव्हरब्रीज व्हावा म्हणून ३ संरक्षणमंत्री ,१२ खासदारांची कमिटी , ३ शिष्टमंडळे, लोकसभेत 4 वेळा आक्रंदन असा सातत्याने पाठपुरावा केला , संघर्ष केला आणि आता याच रेल्वे पुलाच्या भूमिपूजन समारंभात मात्र मी उपस्थित राहूनही भाजपच्या २ आमदारांना बोलू दिले आणि मला २ मिनिटे बोलू दिले नाही ,अशी व्यथा मांडत भाजपच्या कार्यक्रमातील चंद्रकांत दादा पाटील यांच्या घाईच्या कृतीबाबत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपली खंत ‘माय मराठी’ कडे बोलताना व्यक्त केली .
आज सायंकाळी घोरपडी रेल्वे ओव्हरब्रीज च्या भूमिपूजनाचा समारंभ महापालिकेने आयोजित केला होता . विशेष म्हणजे या समारंभासाठी ज्यांनी श्रम घेतले त्या स्थानिक नगरसेवकांना देखील भाषणाची संधी मिळाली नाही . यावेळी उपस्थित असलेले खासदार गिरीश बापट यांना देखील बोलण्याची संधी मिळाली नाही . महापौर यांनी प्रास्तविक करत या पुलाची कशी गरज होती ते सांगितले . आणि त्यानंतर हडपसर आणि लष्कर विभागाचे आमदार टिळेकर आणि कांबळे यांनी भाषणे ठोकली . यावेळी ज्यांनी १० वर्षे हा पुल व्हावा म्हणून संसदेत आवाज उठविला , ३ संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयात १२ फायली तयार केल्या ,आणि विविध मार्गे सातत्याने प्रयत्न केले ते शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यावेळी उपस्थित होते . त्यांनी मला २ मिनिटे बोलू द्या अशी विनंती केली .पण मला घाई आहे असे सांगत तातडीने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माईक चा ताबा घेतला आणि कार्यक्रम संपविला देखील .. गोंधळातच आभार मानले गेले. चंद्रकांत दादांच्या या साऱ्या घाईघाई च्या कारभारात शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील मात्र दुखावले गेले . आपण एवढे सारे केले म्हणून येथे आलो आणि २ मिनिटे देखील आपल्याला बोलू दिले नाही याची चुटपूट त्यांना लागून गेली ..त्यानंतर त्यांनी पहा आणि ऐका नेमके काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात …