पंढरपूर: ‘युतीच्या फालतू चर्चेत मला पडायचे नाही. युती करायची की नाही हे जनताच ठरवेल, आम्ही ठरवलंच आहे. आता शेतकरी-कष्टकऱ्यांचं तुफान उठलंय. त्याला शांत करणार नसाल तर तुमच्या मांडीला मांडी लावून बसण्यात काय अर्थ. मला सत्ता नकोय. जागा वाटपात मला स्वारस्य नाही. राम मंदिर झालंच पाहिजे, तुमचं जागा वाटप गेलं खड्ड्यात,’ असा घणाघात करतानाच पिक विम्याचं कंत्राट खासगी कंपनीला दिलं. राफेलमध्ये घोटाळा झालाय. किती पापं करणार? कडुलिंबालाही किड लागलीय. हे पहिल्यांदाच असं घडतंय. करणार काय? हल्ली पहारेकरीही चोऱ्या करायला लागलेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.
हिंमत असेल तर शिक्षा करून दाखवा
‘शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवणं गुन्हा असेल तर तो गुन्हा करणारच. न्याय मागणं आणि सरकारला धारेवर धरणं गुन्हा असेल तर हा गुन्हा करणारचं. हिंमत असेल तर मला शिक्षा करून दाखवा,’ असं आव्हान देतानाच तुमची मस्ती इथे नाही चालणार. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र तुमची मस्ती खपवून घेणार नाही, असा घणाघातही त्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांच्या ठिकऱ्या उडाल्या
उद्धव यांनी सभेच्या सुरुवातीलाच पाच राज्यातील निकालावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. मिझोराम आणि तेलंगणात प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, असं सांगतानाच आम्ही जगज्जेते आहोत असा समज असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या पाच राज्यातील निकालांनी ठिकऱ्या उडवल्या, अशी टीकाही त्यांनी केली.
देवाच्या नावानं जुमला कराल तर ठोकून काढू
तुम्ही अच्छे दिनचं आश्वासन दिलं ते पूर्ण केलं नाही. त्याबद्दल तुम्हाला एकवेळ माफ करू. इतर मुद्द्यावरही तुम्हाला माफ करू, पण आमच्या देवाच्या नावानं जर जुमला केला तर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पासवान, नितीशकुमारांनी राम मंदिरावर भूमिका मांडावी
जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवायला निघाले होते, त्यांच्यासमोर भाजपनं गुडघे टेकलेत. भाजप आज या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसला आहे, असं सांगतानाच राम मंदिराबाबत नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान त्यांनी दिलं. मोदींनी राम मंदिराबाबत संसदेत चर्चा घडवून आणावी. माझं तुम्हाला आव्हान आहे. मग कळेल एनडीएतील कोणते घटक पक्ष तुमच्या बाजूने उभे राहतात, असा चिमटाही त्यांनी काढला.
>> जगज्जेते असलेला जो समज पसरवला होता त्याच्या ठिकऱ्या पाच राज्यांनी उडवून टाकल्या.
>> पाच राज्यांपैकी मिझोरम आणि तेलंगणात प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली
>> छत्तीसगडमध्ये बहुसंख्य आदिवासी आहेत. त्याठिकाणी पर्याय नसल्याने छत्तीसगडने आधी घर स्वच्छ करायचे म्हणून विरोधात मतदान केले.
>> राममंदिर बांधणारच पण झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी अयोध्येला गेलो होतो.
>> आज पंढरपुरातही त्याचसाठी आलो आहे. तू झोपला असला तरी हिंदू जागा आहे, हे मला कुंभकर्णाला सांगायचे आहे.
>> सर्व जातीपातीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार
>> हल्ली पहारेकरीही चोऱ्या करायला लागले आहेत
>> देशात शस्त्र खरेदी करण्यात घोटाळा होतो. सैनिकांच्या पगारवाढीचा प्रस्ताव फेटाळला जातो.
>> सरकारी कंपनी असताना खासगी कंपनीला कंत्राट का दिले जाते.
>> युती करायची की नाही ते जनताच ठरवेल
>> सोहराबुद्दीनच्या हत्येच्या कटातील आरोपी निर्दोष सुटले, पण राममंदिर संबंधित खटले आजही सुरू आहेत.
अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारणी करता जनजागृतीसाठी उद्धव ठाकरे सोमवारी महासभा घेऊन चंद्रभागा नदीची महाआरजी करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाले आहे.