पुणे – पुणे हे विद्येचे माहेर घर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विज्ञानाचे शहर आहे. या शहरात नाटककार राम
गणेश गडकरी यांच्या पुतळा फोडला जातो. या निवडणुक प्रचारात पुण्याची सत्ता आमच्याकडे द्या मी पुणे शहर बदलून
दाखवतो असे मुख्यमंत्री पुण्यात येऊन सांगतात. मग त्याच मुख्यमंत्र्यांनी त्यांना असलेला विशेष अधिकार वापरून
गडकरींचा पुतळा का बसवला नाही ? असा सवाल अभिनेते व शिवसेना उपनेते शरद पोंक्षे यांनी आज संवाद या
कार्यक्रमात केला.
पाषाण – बाणेर – बालेवाडी प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेनेचे उमेदवार चंद्रशेखर तथा सनी विनायक निम्हण, संजय
निम्हण, रोहिणी धनकुडे आणि नीता रणपिसे यांच्या प्रचारार्थ शरद पोंक्षे यानी पाषाण, सूस रोड परिसरातील
नागरीकांशी संवाद साधला. त्यात त्यांनी शिवसेना, भाजपशी केलेली युती, युती का तुटली ? अशा मुद्यांवर नागरीकांशी
संवाद साधला. व्यासपीठावर आल्यावर त्यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. त्यांचा या परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
दिलीप रात्नाळीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उमेदवारांच्या वतीने संजय निम्हण आणि नीता रणपिसे यांनी
मनोगत व्यक्त केले.
ते म्हणाले, मराठी माणसांना नोक-या न मिळणे, इतरांकडून सतत अपमान, अन्याय होणे अशा परिस्थितीत मुंबईत
मराठी माणसांच्या बाजूने म्हणजे येथील भूमिपुत्रांच्या बाजूने अन्यायाविरूद्ध संघर्ष करण्यासाठी शिवसेना ही संघटना
स्थापन झाली. पण संघर्ष कितीही केला तरी परिस्शितीत फारसा बदल होत नसल्याने परिस्थिती बदलण्यासाठी
निवडणुका लढवुन जिथे लोकांसाठी निर्णय घेतले जातात अशा सभा गृहात जाण्यासाठी शिवसेनेने राजकीय पक्ष म्हणून
निवडणूक लढवायला सुरूवात केली आणि ठाणे महापालिकेवर पहिल्यांदा भगवा फडकवला.
शिवसेना हा पक्ष नसल्याने येथे कार्यकर्ते कोणीच नाही आहेत ते सैनिक जे सतत संघर्ष करतात. असे सैनिक अन्य
कोणत्याच राजकीय पक्षांकडे नाही असे सांगून ते म्हणाले, शिवसेनेचे चिन्हं आहे ते शस्त्र म्हणजे धनुष्यबाण, जे
घेण्यासाठी धाडसच लागते. नाही तर आज पक्षांची चिन्हं आपण बघतोच की पंजा आहे खाली धड नाही, बिन कोळशाचं
इंजिन आहे मागे डबेच नाहीत. घड्याळात स्थापनेपासून दहा वाजून दहाच मिनिटे झालीत, त्यात सव्वादहा कधी
वाजतील याचीच लोक वाट बघत आहेत.
युतीबद्दल ते म्हणाले, पंचवीस वर्षाची भाजपसोबत असलेली शिवसेनेची युती ही फक्त हिंदुत्व या एकाच मुद्यावर होती.
राजकीय पक्ष म्हणून काम करतानाही शिवसेनेने या मुद्याशी कधीच तडडजोड केली नाही. मात्र २०१४ साली भाजपला
केंद्रात बहुमत मिळाल्यानंतर सगळीच समीकरणं बदलली. त्यानंतर वाजपेयी, अडवाणी यांची भाजप बदलून मोदी –
शहांची नवी भाजप तयार झाली. ही नवी भाजप अब की भाजप की सरकार असं न म्हणता मोदी सरकार अशी व्यक्ती
केंद्रीत झाली आहे. अमेरिकेप्रमाणे भरतातही दोनच पक्ष असले पाहिजेत ही भाजपची भूमिका अमीत शहा यांनी उघडपणे
मांडली. त्यामुळे विधान सभेच्यावेळी युती तोडण्याचा भाजपचा निर्णय अडीच महिने अगोदरच झालेला होता फक्त युती
तोडली हे सांगायचं कोणी यावर गाडं अडलं होतं. ऐनवेळी सांगूनही शिवसैनिकांच्या बळावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांनी हे आव्हान स्वीकारलं. आता यापुढे कोणाशीच युती नाही असं जाहीर केलं आहे.
या देशाची स्थापनाच ही प्रादेशिक वादावर झालेली आहे. त्यामुळेच येथे भाषावार प्रांत रचना करण्यात आली. त्यामुळेच
या देशात प्रादेशिक पक्षही स्थानिक अस्मितेवर तयार झाले असून शिवसेना ही त्यापैकीच एक आहे असे सांगून शरद पोंक्षे
म्हणाले, या देशातून प्रादेशिक पक्ष कोणीच कधी संपवू शकणार नाही.यापुढे गृहित धरलेल मतदार राहू नका असे
आवाहन त्यांनी केले. या सांस्कृतिक राजधानीत गडकरींचा पुतळा फोडला जातो आणि तो फोडणा-यांना गडकरी कोण
होते हेही माहिती नसतं. मग हाच पुतळा विशेष अधिकार वापरून पुन्हा ४८ तासात बसवायला मुख्यमंत्र्यांचे कोणी हात
धरले होते मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिकार वापरून पुतळा मुख्यमंत्र्यानी का बसवला नाही ? अशा गोष्टींसाठी पुण्यात
शिवसेनेला ताकद मिळण्याची गरज आहे. मुंबई, ठाण्यात रूजलेली शिवसेना आता पुण्यात रूजवण्यासाठी या
निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला एकहाती सत्ता द्या आणि भगवा पुणे महापालिकेवर फडकवा असे आवाहन त्यांनी
केले.