मुंबई – आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार शिवसेनेचे नेते यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून खडाजंगी सुरू असताना त्यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडली. महाराष्ट्रातील राजकारण बदल आहे. आणि शिवसेनेला न्याय्य लढ्यात निश्चितच विजय मिळेल अशी अपेक्षा देखील संजय राउत यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे नेते संजय राउत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, “निर्णय झाला आहे, की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेना पक्षातूनच राहील.” राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशात शिवसेना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना मुख्यमंत्री पद देणार अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, संजय राउत यांनी ही शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. यात भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी 288 पैकी 145 जागा मिळवणे आवश्यक आहे. भाजप-शिवसेना महायुतीने 161 जागा मिळाल्या आहेत. तरीही मुख्यमंत्री आपल्याच पक्षातून हवा या मागणीवर दोन्ही पक्ष अडून आहेत. त्यामुळेच, सत्ता स्थापनेला विलंब होत आहे.