पुणे : कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना लाच्छनास्पदच आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशीच इच्छा सर्वांसोबतच सरकारचीदेखील आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संबंधीत घटनेचा निकाल नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता वर्तविलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे कोपर्डी घटनेचे राजकारण करीत आहेत. ते त्यांनी करू नये, अशी अपेक्षा भाजपाचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केली.
खासदार सुळे यांनी कोपर्डी घटनेचा निकाल 1 जानेवारीपर्यंत न लागल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे वक्तव्य आज पुण्यात केले आहे. त्यावर खासदार संजय काकडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. खासदार काकडे म्हणाले की, कोपर्डी घटनेबद्दल जेवढी काळजी राष्ट्रवादीच्या खासदारांना आहे. त्यापेक्षा अधिक काळजी फडणवीस सरकार घेत आहे. कोपर्डी घटनेतील पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी काम केले गेले आहे. तसेच, आरोपींना फासावर लटकवेपर्यंत सरकार शांत बसणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले आहे व याकामी सर्वांनी एकत्र येऊन एकजूट दाखविण्याचे आवाहनदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते.
सर्वोत्तम सरकारी वकील उज्ज्वल निकम हे त्या खटल्याचे काम पाहात आहेत. स्वत: निकम यांनीच नोव्हेंबरमध्येच निकाल लागेल असे म्हटलेले असताना खासदार सुळे यांनी या विषयाला आता वेगळे वळण देण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रसविषयी लोकांची गेलेली सहानुभूती अशा घटनेच्या माध्यमातून परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदारांनी केलेली ही केविलवाणी धडपड वाटते, असेही खासदार काकडे यांनी सांगितले.