सांगली – सांगलीच्या ब्राम्हनाळ येथे पुरस्थितीत सुरु असलेल्या बचाव कार्यादरम्यान 25 ते 30 जणांना घेऊन जाणारी बोट उलटली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून इतर बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ब्रह्मनाळ (तालुका पलूस जि. सांगली) येथे ग्रामपंचायतची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह हाती आले. तर 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. सोबतच, आणखी 3 जणांना बुड़ाल्याची शक्यता असून 3 जणांचा काहीच पत्ता नाही. NDRF TEAM घटनास्थळी पोहोचली असून शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.
या बोटमध्ये एकूण 30 लोक होते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्य सुरू असताना जवळपास 30 जणांना एक बोट घेऊन जात होती. याचवेळी बोटच्या इंजिनमध्ये झाडाची तुटलेली फांदी अडकली. याच फांदीमुळे इंजिनमध्ये बिघाड आला आणि बोट बुडाली. या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. त्यांनी कोल्हापूरच्या दौऱ्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.