सलाम त्या प्रत्येक कार्यकर्त्याला, सलाम त्या प्रत्येक सुजाण पुणेकराला जो रात्रभर विविध रस्त्यांवर थांबून वाहतुकीचे नियोजन करत होता. जो आपल्या परिसरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी धडपडत होता, जो अनोळखींना त्यांचे नाव गाव न विचारता लिफ्ट देत होता…
एव्हाना पहाट झालीए. सुदैवाने वरुणराजा जरा शांत झालाय, सगळीकडचे पाणी ओसरलय (किमान आत्तातरी) आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आलीए… नेहमी ज्या पुण्याच्या रस्त्यांवरून उत्साह ओसंडून वाहत असतो, टिपीकल पुणेरी बाणा जिथे जागोजागी आपले अस्तित्व दाखवत असतो त्या पुणे शहरात एवढी तणावग्रस्त आणि भयावह रात्र मी कधीच अनुभवली नव्हती. एकाच रात्री सायरन चे एवढे आवाज कधीच अनुभवले नव्हते. पण सांगायला खरजच आनंद होतो की संपूर्ण पुणे शहरात असा एक रस्ता नव्हता जिथे जर पुढे काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्या आगोदरच वाहतुक दुसरीकडे वळवायला कार्यकर्ते किंवा स्थानिक नागरिक नव्हते. युध्दजन्य परिस्थितीत सैनिक कसे आपला चेकपोस्ट सांभाळत असतात त्याप्रमाणे हजारो पुणेकर मदतकार्यासाठी रस्त्यावर उतरले होते. अंगात कार्यकर्तागिरी भिनलेले कार्यकर्ते तर अशा वेळी घरात बसूच शकत नाही पण एक दोन ठिकाणी तर मी असे पण लोक पाहिले की जे आपल्या बायकोच्या मदतीने किंवा घरातल्या तरुण मुलीला रात्री २ वाजता बरोबरीने घेऊन रस्त्यावर अडकलेल्या नागरिकांना मदत आणि मार्गदर्शन करत होते. अगदी काही तासांच्या या धुमाकुळाने काही भागांमधे तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांना वरच्या मजल्यावर स्थानांतरित व्हावे लागले पण खात्री आहे असे एक कुटुंब नसेल की ज्याला आता कुठे जाऊ? कुठे राहू? असे प्रश्न पडले असतील… देव करो पुन्हा अशी रात्र न येवो… कमी झालेल्या पावसाच्या कृपेने परिस्थिती आत्ता जरी नियंत्रणाखाली असली तरी आंबिल ओढा आणि अजून काही भागांमधील हजारो नागरिकांना आजूबाजूच्या शाळा, सरकारी इमारती इथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. देव करो आणि त्यांना लगेच आपाआपल्या घरी जाण्याची संधी मिळो पण जर तसे नाही होऊ शकले तर मात्र या बांधवांसाठी मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंची गरज पडेल. तेंव्हा स्थानिक कार्यकर्ते, मंडळे यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी किंवा मदतकार्यात सहभागी होण्यासाठी वंदेमातरम् संघटना कृत युवा वाद्य पथकाचा ९८२२२३९७९० हा हेल्पलाईन क्रमांक २४तास उपलब्ध आहेच.
हे आकस्मिक संकट रात्री आले हे जरा बरय, कारण बहुतांश लोक कामधंद्यावरुन घरी पोहचले होते पण जर हे दिवसा घडले असते तर परिस्थिती अजूनच वाईट झाली असती. अजून पण अशा पावसाची शक्यता आहेच. टक्केवारीच्या भस्मासुरांनी कसेही केलेले सिमेंट, कॉंक्रिट रोड , चुकीची झालेली अतिक्रमणे यांना वेळीच विरोध न केल्यामुळे आपण आगोदरच माती खाल्ली आहेच त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा उदभवु नये यासाठी किमान यापुढे तरी शहाणे होऊयात, एक होऊयात… अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपआपला परिसर आणि प्रत्येक माणूस आपला मानून सांभाळला तरी सगळं नियंत्रणात राहू शकतं. कदाचित कालची रात्र ही भविष्यासाठी फक्त एक संकेत असेल…
-वैभव वाघ