नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.
पुणे-विविध संस्थांसोबत नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवत असताना माझ्या लक्षात आले की नागरिक जाता येता सहजपणे नदीत व नदीपात्रात कचरा ,निर्माल्य,देवाच्या फ्रेम सह इतर साहित्य भिरकावून जातात असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.यातूनच नदी प्रदूषित होत असून पात्र अत्यंत गलिच्छ अवस्थेत आहे,त्याच वेळेस यावर उपाययोजना करायचे ठरविले व माझ्या विकास निधीतून म्हात्रे पुलावर जाळ्या बसविण्यासाठी निधीची तरतूद केली असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.
त्याप्रमाणे नदीपात्रात राजपूत वीटभट्टी जवळ जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण झाले असून संपूर्ण म्हात्रे पुलावर ही संरक्षक जाळ्या बसविण्यात येत आहेत.आता नागरिकांना सहजपणे नदीत कचरा भिरकावता येणार नाही मात्र नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी आणि आपली नदी व नदीपात्र स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ही सौ मंजुश्री खर्डेकर यांनी केले आहे.तसेच या ठिकाणी नागरिकांना आवाहन करणारे व नदीचे माहात्म्य विषद करणारे फलक लावण्यात येतील व निर्माल्य कलश ठेवून त्यांच्या वेळोवेळी सफाईची व्यवस्था ही केली जाईल असे ही त्यांनी स्पष्ट केले.