समाजमनातून हिंसा ;अहंकार काढून टाकल्यास मॉबलिंचिंगसारखे प्रकार पुन्हा होणार नाहीत.
मुंबई- प्रत्येकाला माणसाला जगण्याचा अधिकार आहे हे मान्य करून इतरांशी स्नेह;प्रेम; शांती;समता ; आणि अहिंसा या बुद्ध तत्वज्ञानाने दिलेल्या जीवनमूल्यांचा स्वीकार करून वागल्यास कोणीही सूडबुद्धीने हल्ले करणार नाही. समाजमनातून हिंसा आणि अहंकार मिटविल्यास मॉबलिंचिंग सारख्या हिंसक घटना घडणार नाहीत. भारताला अधिक शक्तीशाली होण्यासाठी बुद्धांच्या शांती आणि अहिंसेच्या विचारांची गरज आहे. जगाच्या कल्याणासाठी युद्धाची नव्हे तर बुद्धांची गरज आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
माता रमाबाई आंबेडकर नगर येथील शाहिद स्मारक येथे आयोजित 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित धम्मसंमेलनात रामदास आठवले बोलत होते. यावेळी बौद्ध भिक्खू संघाला ना.रामदास आठवले यांच्या हस्ते चिवरदान करण्यात आले. यावेळी पूज्य भन्ते डॉ राहुल बोधी महाथेरो यांच्यासह भिक्खू संघ उपस्थित होते. राज्यमंत्री ना अविनाश महातेकर; गौतम सोनवणे; रिपाइं डी. एम चव्हाण;बाळासाहेब गरुड; काकासाहेब खंबाळकर; आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
तथागत भगवान बुद्धांनी जगाच्या कल्याणासाठी बौद्ध धम्म दिला आहे. बौद्ध धम्म हा अखिल मानवजातीसाठी आदर्श जीवनमार्ग आहे. बौद्ध धम्म शांतताप्रिय ; समतावादी; वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा परिवर्तनवादी बौद्ध धम्म आहे. सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मचक्र प्रवर्तित केले. त्यानंतर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मचक्र प्रवर्तित केले. बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात धम्मक्रांती घडविली. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली याचा आम्हाला अभिमान आहे असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.
नुकताच अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे असे सांगत जगाला बुद्धांच्या विचारांची गरज असल्याचे महत्व सांगितले होते याची आठवण करून देत रामदास आठवले यांनी केवळ भारताच्या प्रगती साठी नव्हे तर संपूर्ण जगाच्या हितासाठी बुद्धांनी दिलेला अहिंसा आणि शांती चा विचार आवश्यक आहे असे मत मांडत 63 व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या