आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने हास्य-विनोद-आनंदमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आठवडाभर निरनिराळ्या सुप्रसिध्द विनोदी लेखकांना निमंत्रित करुन त्यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. याशिवाय समारोपाच्या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पुण्याच्या विनोद विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांची 120 वी जयंती 13 ऑगस्ट रोजी झाली. आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गेली 21 वर्षे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. बाबूराव कानडे आणि त्यांच्या सहका-यांच्या पुढाकाराने हा महोत्सव होतो.
हास्य-विनोद-आनंदमहोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिध्द लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते 7 ऑगस्ट रोजी झाले. प्रारंभी आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बाबूराव कानडे, डॉ. शाल्मली कुलकर्णी, डॉ. शौनक कुलकर्णी, राजश्री दवणी, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते. आचार्य अत्रे यांनी ज्या-ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले तिथे-तिथे स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले, अशा शब्दात गोडबोले यांनी आचार्य अत्रे यांच्या कार्याचा गौरव केला. श्रीमती गोडबोले यांनी मराठी साहित्यातील विनोद परंपरेचा व्यापक आढावा सादर केला. लिळा चरित्रातही विनोदाचे स्थान आढळून येते. संत काव्यात, संस्कृत नाटकातही विनोद आढळून येतो. बाईने चेष्टा करणे तत्कालिन समाजाला मान्य नसल्याने संस्कृत नाटकात विदूषक हा पुरुषच दिसून येतो. लोकसाहित्यातील उखाणे, जात्यावरील गाणी हे विनोदाचेच एक अंग आहे. विनोदी परंपरा प्राचीन असल्याचे सांगून विनोदासाठी उत्स्फूर्तता आणि बुध्दीमत्ता लागत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शि. म. परांजपे, ह.ना.आपटे, श्री.कृ. कोल्हटकर, रा. ग. गडकरी, चिं.वि. जोशी, दत्तू बांदेकर, पु.ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांनी विनोदी साहित्याला दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरवाने उल्लेख केला. यावेळी गोडबोले यांनी विनोदी प्रसंग, किस्से सांगून विनोदाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट केले.
आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बाबूराव कानडे यांनी प्रास्ताविकात हास्य-विनोद-आनंदमहोत्सवाच्या आयोजनामागचा हेतू सांगितला. आचार्य अत्रे म्हणजे हास्याचा विश्वव्यापी गडगडाट आणि खळखळाट होते. हशा आणि टाळ्यांचे अभेद्य समीकरण होते. अभिजात विनोद, निखळ विनोद, अतिशयोक्तीपूर्ण विनोद, सामाजिक, राजकीय दोषांचे विश्लेषण करणारा विनोद, स्वभावनिष्ठ विनोद, प्रसंगनिष्ठ विनोद, कल्पनानिष्ठ विनोद असे इतर कोणीही एकत्रितरित्या न हाताळलेले विनोदाचे निरनिराळे प्रकार आचार्य अत्रे यांनी हाताळले म्हणूनच त्यांना विनोदसम्राट म्हणतात. आचार्य अत्रे एकमेव-अद्वितीय असे व्यक्तिमत्व होते. आचार्य अत्रे म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभेची गरुडझेपच होती. त्यांचा जन्म दिन 13 ऑगस्ट हा अखिल भारतीय मराठी विनोद दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे अॅड. कानडे यांनी सांगितले.
सुभाष खुटवड, मुकूंद टांकसाळे, श्रीकांत बोजेवार, डॉ. आनंद देशपांडे, श्रीपाद ब्रम्हे या सुप्रसिध्द विनोदी लेखकांनी या हास्य-विनोद-आनंदमहोत्सवात हजेरी लावली. आपल्या व्याख्यानात जीवनाची वाटचाल, आलेले अनुभव, विनोदाचे महत्त्व, आचार्य अत्रे यांचे विविध क्षेत्रातील योगदान यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला.
पुरस्कार वितरणप्रसंगी माजी न्यायमूर्ती प्रमोद कोदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले, नाट्यकर्मी अशोक समेळ, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बाबूराव कानडे उपस्थित होते. कवी केशवकुमार आचार्य अत्रे पुरस्कार सूर्यकांत वैद्य, आद्य विडंबनकार आचार्य अत्रे पुरस्कार विश्वास वसेकर, विनोदी लेखक आचार्य अत्रे पुरस्कार श्रीपाद ब्रम्हे, शिक्षणतज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार डॉ. राम ताकवले, पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार प्रगती बाणखेले, उद्योगपती आचार्य अत्रे पुरस्कार राजेश मंडलिक, प्राचार्या सुधाताई अत्रे सामाजिक पुरस्कार राजश्री प्रसन्न दवणी, अक्षरवाङ्मय आचार्य अत्रे पुरस्कार आशीष चांदोरकर, बृहत आत्मचरित्र आचार्य अत्रे पुरस्कार अशोक समेळ, आचार्य अत्रे विशेष पुरस्कार देवदत्त गोपाळ अनगळ, सिध्दहस्त व्यंगचित्रकार आचार्य अत्रे पुरस्कार राजेंद्र सरग यांनी स्वीकारले. याशिवाय वक्ता दशसहस्त्रेषु आचार्य अत्रे पुरस्कार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शक आचार्य अत्रे पुरस्कार अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे पुरस्कार प्रताप फड, सुवर्णपदक विजेते आचार्य अत्रे पुरस्कार प्रसाद ओक, रंगकर्मी हास्य अभिनेता आचार्य अत्रे पुरस्कार अतुल परचुरे, राजकीय कार्यक्षम कार्यकर्ता नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष हिमगौरी आडके आदींनी वितरित करण्यात आले.
न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांत विनोद आणि व्यंगचित्राचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, विनोद किंवा व्यंगचित्र केवळ हास्यरस निर्माण करत नाहीत तर ते समाजप्रबोधनही करत असते. हास्याचा बुध्दीशी संबंध आहे त्यामुळेच विनोद निर्माण करणारी व्यक्ती बुद्धीवंत असते. आजच्या युगात हसण्यावर मर्यादा येत आहेत, पण पोटभर हसणे गरजेचे आहे. व्यंग किंवा विनोद जीवघेणा नसावा याचे भान असले पाहिजे, असे नमूद करुन हसणे ही जीवनाची संजीवीनी असल्याचे त्यांनी सांगितले. विनोद, व्यंगचित्र, विडंबन यामधून सामाजिक प्रबोधन कसे होईल, यावर अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.
आचार्य अत्रे हे मराठी संस्कृती जपणारे एक बहुगुणी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार ज्या मान्यवरांनी स्वीकारले त्यांची सामाजिक जबाबदारी वाढली आहे. आचार्य अत्रे ह्या नावाचे वलय प्रत्येक क्षेत्रात आहे. राजकारण, साहित्य, समाजकारण, नाटक, चित्रपट, लेखक अशा विविध कलागुणांनी समृध्द असणारे व्यक्तीमत्व म्हणजे आचार्य अत्रे, असे न्यायमूर्ती कोदे म्हणाले. आचार्य अत्रे ही व्यक्ती आजही मराठी मनांवर अधिराज्य गाजवत आहे. मराठी संस्कृती जपण्याचे काम त्यांनी केले. ‘मी कसा झालो’ हे त्यांचे पुस्तक आजच्या पिढीसाठी मागर्दशक असून तरूणांनी ते जरुर वाचावे, असे आवाहन न्या. कोदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बाबूराव कानडे, डॉ. शाल्मली कुलकर्णी, शंकर डी. पाटील, डॉ. शौनक कुलकर्णी, अनिल अत्रे, अॅड. वसंतराव कर्जतकर आदी प्रयत्नशील होते. कार्यक्रमास रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
राजेंद्र सरग
जिल्हा माहिती अधिकारी, पुणे