नवी दिल्ली : राफेल कराराच्या मुद्यावरून मोदी सरकारला घेरत असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नरेंद्र मोदी यांनी आपली चूक मान्य केली आहे.
राहुल गांधी यांनी मंगळवारी याबदल एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयात मोदी यांनी आपली चोरी मान्य केली आहे’. ‘प्रतिज्ञपत्रात त्यांनी मान्य केले आहे की, त्यांनी वायूसेनेला न विचारताच करार बदलला आणि 30,000 कोटी रूपये अंबानी यांच्या खिशात टाकले’. पुढे राहुल गांधी यांनी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असं लिहित ‘राफेल करारा’बाबत आणखी खुलासे होणे बाकी असल्याचे सुचविले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारने आज राफेल खरेदी प्रक्रियेची माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली. राफेलची खरेदी प्रक्रिया आणि किंमत जाहीर करण्यास केंद्र सरकार सारखी कां-कूं करीत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने ’36 राफेल विमान खरेदी निर्णय प्रक्रियेची सविस्तर माहिती’ असे लिहिलेला लिफाफा न्यायालयात सादर केला.
राफेल खरेदी प्रक्रियेची माहिती सादर करताना केंद्र सरकारने म्हटले आहे की, जेट खरेदी प्रकरणात सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे. कॅबिनेटच्या संरक्षणविषयक समितीने मंजुरी दिल्यानंतरच सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने ही माहिती एका बंद लिफाफ्यात दिली आहे.