कवीवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरी (पुणे) – चंगळवाद, प्रलोभनं, नैराश्य, यातून मुलांना फक्त शिक्षकच बाहेर काढू शकतात. प्रत्येक मुलामध्ये एक कथा दडलेली असते. ती समजण्यासाठी शिक्षक ती किती समृद्धपणे घेतो, सकसपणे घेतो यावर सगळं अवलंबून आहे. इतरांपेक्षा शिक्षकांना एक जादा शक्ती भाषेच्या रूपाने मिळाली आहे. शिक्षकांनी करावा. मुलांना भाषा चांगली बोलायला शिकवून त्यांना प्रलोभनं, चंगळवादाच्या विळख्यातून बाहेर काढून चांगली पिढी घडवावी असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरूणा ढेरे यांनी आज येथे केले.
बालगंधर्व रंगमंदिरातील कविवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरीत भरलेल्या पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप प्रसंगी डॉ. ढेरे बोलत होत्या. स्वागताध्यक्ष आमदार विजय काळे, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी दिपक माळी, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या समारोप समारंभात स्वच्छ भारत अभियानाबद्दल हुजूरपागेची विद्यार्थीनी पूर्वी गवळी हिने काढलेल्या चित्राचे टपाल तिकीट काढले आहे. त्याबद्दल पूर्वा व तिच्या पालकांचा यथोचित गौरव डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला.
डॉ अरूणा ढेरे म्हणाल्या, नोबेल पारितोषिक मिळवणारे रविंद्रनाथ यांचे कायम आठवण शिक्षकांनी ठेवले पाहिजे. शिक्षक काय करू शकतो तर शिक्षक एक साहित्यिक घडवतो हे रविंद्रनाथांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांची आठवण ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रमाणे आपल्यातही विचार, भावना व्यक्त करणारी आंतरिक ओढ असली पाहिजे. काही झाले तरी मी हे जग सुंदर करून दाखवीन असा आंतरीक दिवा पेटवा असा सल्ला त्यांनी दिला.
जेव्हा सहृदयशक्ती आणि मानसिक शक्ती एकत्र येते तेव्हा साहित्य निर्माण होते असे सांगून त्या म्हणाल्या, साहित्यिक आपल्या भोवतीच्या समाजाला, वातावरणाला स्पष्ट शब्द देऊ शकतो. शिक्षकांना भाषेची देणगी ही त्यांच्या पेशानेच दिलेली असल्याने शिक्षकांनी साहित्यिक व्हावे. साहित्याने दिलेली देणगी मुलांपर्यंत पोचवावी. आपल्या समोर वर्गात असलेल्या नव्या पिढीत साहित्यिक निर्माण व्हावेत यासाठी मुलांना पाठ्यपुस्तकाच्या बाहेर न्या. मुलांना चांगली भाषा वापरायला, बोलायला शिकवा
साहित्यिक लहान मुलासारखा असतो. तो कुतुहल दृष्टीने जगाकडे बघतो असे सांगून डॉ. ढेरे म्हणाल्या, त्याने अनुभवलेल्या सुखदु:खांना आणि त्या पलिकडे त्याने गमावलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवतो. साहित्यिक पंचेंद्रीयांनी जग अनुभवतो. भोवतीचं जग आपलं करतो म्हणूनच जे सामान्य माणूस पाहू शकत नाही ते साहित्यिक पाहू शकतो. व्यवहारातील भाषेला सर्जनशीलतेच्या पातळीवर नेतो तो खरा साहित्यिक. असा साहित्यिक होण्याच शिक्षकांनी प्रयत्न करावेत आणि समाजाला दिशा द्यावी असे आवाहन त्यांनी केले,
प्रास्ताविकात स्वागताध्यक्ष आमदार विजय काळे म्हणाले, पूर्वी पगार कमी असला तरी अनेक जण ठरवून शिक्षक झाले. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज नोकरी मिळत नाही म्हणून शेवटी शिक्षकाची नोकरी स्वीकारली जाते. आज विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, व्यसनाधिनता असे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. मोबाइलमुळे मुले पालकांच्या हातात राहिलेली नाहीत. हे चित्र बदलण्याची, त्यात परिवर्तन करण्याची ताकद फक्त शिक्षकांच्यात आहे. त्यासाठी त्यांनी आवांतर वाचन, लेखन करण्याची गरज आहे. यासाठी त्यांना स्फूर्ती मिळावी म्हणून हे शिक्षक साहित्य संमेलन आहे. असे संमेलन पुढच्या वर्षीही होणार असून त्यासाठी महिनाभर अगोदर नाव नोंदणी केली जाणार असून संमेनलाने गांभिर्य व वातावरण चांगले रहावे यासाठी नोंदणी केलेल्यांना संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे.