कवीवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरी (पुणे) – शिक्षक आणि आईचे स्थान समान आहे. कारण आई जसं आपल्या मुलाला घडवते तसेच शिक्षक व्य्कती समाज घडवण्याचं काम करतात. या शिक्षकाना जेव्हा विकास प्रकियेत सहभागी करून घेतल्यानंतरच खरा विकास होईल. यासाठी शिक्षकांचे महत्व शासनाला कळण्याच्या दृष्टीने दिशा दर्शक असे हे शिक्षक साहित्य संमेलन आहे असे प्रतिपादन सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी आज येथे केले.
बालगंधर्व रंगमंदिरातील कविवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरीत भरलेल्या पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात डॉ. मुजुमदार बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते. साहित्यिक डॉ. न. म. जोशी, स्वागताध्यक्ष आमदार विजय काळे, मन:शक्ती केंद्राचे विश्वस्त प्रमोद शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी दिपक माळी, माजी आमदार बबनराव साळुंके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सिंम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सरस्वतीचे पूजन केले. त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाचे उदघाटन केले. यावेळी शिक्षक कवी मदन व्हावळ यांच्या शब्दगुंजन या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. मुजुमदार म्हणाले, उत्तमातील उत्तम साहित्य निर्मिती ही सानेगुरूजी, ना. सि. फडके, श्री. म. माटे, वि. स. खांडेकर यांच्यासारख्या मूळचे शिक्षक असलेल्यांनीच केली आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याची क्षमता प्रतिभावान शिक्षकांच्यातच असते हे पहिले राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन, सानेगुरूजी यासारख्यांनी करून दाखवले आहे. विद्यार्थ्यांच्यात विषयाची आवड निर्माण होऊन त्यावर त्याचं प्रेम बसावं, पुढे त्यानं त्यातच अध्ययन करून संशोधन करावं अशी प्रेरणा निर्माण करणारा खरा महान शिक्षक होय.
आज कामाच्या व्यापात शिक्षकांना त्यांच्यातील सर्जनशीलता जपता येत नाही अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, ही सर्जनशीलता कमी होत असल्यानेच शिक्षकांची साहित्य निर्मितीचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्या जागी आता डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ साहित्य निर्मिती करताना दिसतात. असे असले तरी शिक्षकांनी आपण केवळ शिक्षकच आहोत म्हणून स्वत:ला कमी लेखू नका कारण व्यक्ती, समाज घडवण्याचे फक्त शिक्षकच करू शकतात. त्यामुळे जेव्हा विकास प्रक्रियेत शिक्षकांना स्थान मिळाल्यानंतरच खरा विकास होईल. त्यासाठी शासनाला शिक्षकांचे महत्व पटणे आवश्यक असून त्यासाठी हे शिक्षक साहित्य संमेलन दिशदर्शक ठरेल. यावेळी त्यांनी अठराव्या वर्षी नोबोल पुरस्कार मिळवणा-या मलालाची गोष्टही सांगितली.
अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले, शिक्षक असणं महत्वाच असून हे व्रत असलेला पवित्र पेशा आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आचरणातून घडवायचं असतं. आज तंत्रज्ञानाच्या युगात अभ्यासक्रमापासून सर्वकाही एका क्लीकवर मिळू शकेल पण आचरण कसं असावं हे ते तंत्रज्ञान शिकवू शकत नाही. ते शिकवण्यासाठी साठी समोर शिक्षकच असावा लागतो. संतांचे वर्णन करताना संत तुकारांमांनीही लिहिले आहे की, अर्भकाचे साठी पंते धरली हाती पाटी / तैसे संत क्रिया करूनी दाखविती जगा
बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, हे सगळेच शिक्षकच होते असे सांगून डॉ. मोरे म्हणाले, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळकांनी कमी वेळात जास्तीत जास्त लोकांना शिकवता यावे यासाठी शिक्षकी पेशा सोडून ते लोकशिक्षक झाले.आपलं सत्व अबाधित ठेवून पत्रकार, साहित्यिक, राजकीय नेते, सामाजसेवक घडवण्याचे काम शिक्षकांनीच करून दाखवले आहे. ही परंपरा पुढे सुरू राखण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ही शिक्षक साहित्य संमेलनाचा उपक्रम आहे.
सध्या पर्यावरणाच्या प्रश्नची चर्चा जशी होते तशीच चर्चा भाषिक पर्यावऱणाची होणे गरजेचे आहे असे सांगून ते म्हणाले, आपल्या भोवतीच्या निसर्ग निर्मित गोष्टी म्हणजे पर्यावरण असे आपण मानतो. आता हे पर्यावऱण कमी होऊन प्रदूषण वाढत आहे त्यामुळे त्याची चर्चा जास्त आहे. आपल्या भोवती आणखी एक पर्यावऱण आहे ते म्हणजे भाषिक पर्यावरण. आपण घरीदारी सर्वत्र बोलतो हे बोलणे म्हणजे काय तर भाषाच होय. भाषा हे खर तर शिक्षकांच माध्यम आहे. आपल्याला विद्यार्थी दशेत साहित्यबद्दल गोडी निर्माण करून शिक्षकच कळत न कळत भाषाच घडवत असतात.भाषेच चांगला वापर कसा करायचा हे शिक्षकच शिकवतात. कारण आपण भाषेतच रहातो. पण सध्या महाराष्ट्रात भाषेबद्दल बराच गोंधळ आहे. हा गोंधळ दूर कऱणारे शिक्षक होणे खरे गरजेचे आहे.
स्वागताध्यक्ष आमदार विजय काळे म्हणाले, सर्वांपेक्षा वेगळा विचार फक्त शिक्षकच करू शकतो आणि जो वेगळा विचार करतो तोच खरा शिक्षक. वाचण्यासाठी साहित्य तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळू शकतं पण आपण काय वाचावं त्यातून काय घ्यावं हे सागण्यासाठी समोर शिक्षकच असावा लागतो. कारण खरं शिक्षण हे संवादातून, हृदयातून होत असतं. शिक्षक विचार समाजात रूजवतात आणि समाज ते पुढे नेतो. असे समाज घडवण्याची क्षमता असलेले शिक्षक पुन्हा तयार व्हावेत यासाठीच हा साहित्य संमेलनाचा उपक्रम आहे. त्यामुळे या सर्वच गोष्टी शिक्षकांनीच केलेल्या असल्याने ख-या अर्थाने शिक्षकानी शिक्षकांसाठी भरवलेले हे शिक्षक साहित्य संमेलन आहे.
शिक्षणाधिकारी डॉ. गणपती मोरे यानी स्वागतपर प्रास्ताविक केले. शिक्षणाधिकारी दिपक माळी यांनी आभार मानले. उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचलन मदन व्हावळ यांनी केले. या उदघाटन सोहळ्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांनी चित्रकलेच्या शिक्षकांनी काढलेल्या चित्रांच्या आणि शिल्पकलेच्या शिक्षकांच्या शिल्प कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उदघाटन केले. मन:शक्ती केंद्राचे प्रमोद शिंदे यांच्या शिक्षकांसाठी आरोग्यपर मार्गदर्शक व्याख्यानाने संमेलनातील कार्यक्रमांची सुरूवात झाली.