दिल से दिल तक
आपल्या बालपणीच्या सवंगड्यांशी खूप वर्षांनी गाठ भेट झाली की त्या भेटीचा परमानंद विलक्षण असतो याचा नुकताच प्रत्यय आला. निमित्त होत हर्ष च्या लग्नाचं. ज्या दिवसाची घरातील सगळेच आतुरतेने वाट पहात होते ….
“रमाकांत तमे आजू आयवा नथी, क्यां छो…?” इति बटुककाका. माझ्या काकाने म्हणजेच रमाकांतने सांगितले, ‘पूर्णिमा आली की निघतोच.’ बटुककाकांच्या मुलाच्या म्हणजेच हर्षुच्या लग्नाच्या रिसेप्शनला जायचे होते आम्हा सगळ्यांना. खरं तर अंमळ उशीरच झाला होता. काका आणि बाबा कधीचेच तयार होऊन बसले होते, कधी पूर्णिमा येतेय, आम्ही हॉलवर पोहोचतोय आणि सगळ्या जुन्या सवंगड्यांना भेटतोय, असं या दोघांना झालं होतं.
हॉलवर पोहोचताक्षणी काका-बाबांची नजर सगळ्यांना शोधायला लागली. समोरच पहिले दर्शन झाले ते आरतीभाभीचे. आमच्याच बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर ती राहायची. गर्दीतून *वाट* काढत आमच्या समोर आली. खूप वर्षांनी भेटल्याचा आनंद तिच्या *चेहऱ्यावर* दिसून येत होता. काय बोलू आणि किती बोलू, असं तिला झालं होतं. आई, निलेश तसेच सहदेवकाका (आम्हा चारपाच जणांच्या घरी सहदेवकाका जवळजवळ 50 वर्षं घरकामाला होते. ते आता गावी असतात. आमच्या कुटुंबातीलच एक सभासद आहेत ते.) घरातल्या सगळ्यांची तिने आपुलकीने चौकशी केली.
जयेंद्र भुवन – दादरमध्ये आमचे जुने घर याच बिल्डिंगमध्ये आहे. ए आणि बी विंगमध्ये स्नेहलता शाळा आहे. तर सी विंगमध्ये पूर्वी आम्ही राहायचो. आताही घर आहे पण हल्ली आम्ही दहिसरला राहतो.
आज रिसेप्शनच्या निमित्ताने सगळे भेटणार होते. बटुककाकाने सगळ्या मित्रमंडळींना, जुन्या शेजारी-पाजा-यांना लग्नाला आवर्जून बोलावलं होतं. जयेंद्र भुवनमधील ब-याचशा जुन्या भाडेकरुंनी आपापली घरं विकून मुंबईच्या उपनगरात राहणं स्वीकारलं. काही शेजाऱ्यांनी नोकरीच्या निमित्ताने, काहींनी मोठे कुटुंब-जागा लहान म्हणून तर काहींनी अजून काहीबाही कारणांनी दादर सोडलं. आरतीभाभी भेटल्या आणि या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
मुकेशकाका, नलिनीकाकी, चिंटू आणि त्याची फॅमिली, रिद्धी वगैरे…एकेकांना भेटत-भेटत आम्ही पुढे जात होतो. काका-बाबांनाही खूप आनंद झाला होता. तेवढ्यात समोरून आवाज आला…’अरे मामा (मामा म्हणजेच रमाकांतकाका, बिल्डिंगमधले सगळे त्याला ‘मामा’ याच नावाने हाक मारतात) कसा आहेस?’ आणि गिरीशकाकाने, माझ्या काकाला कडकडून मिठी मारली. हा दोन मित्रांमधील स्नेहभाव होता, आपुलकी होती. थेट दिल से दिल तक…! किती वर्षांनी भेटले दोघे जण. दोघांनाही झालेला आनंद अवर्णनीय होता. गिरीशकाका, दीपककाका, भाईलाल…जुने सगळे शेजारीपाजारी वेळ काढून आवर्जून लग्नाला आले होते, ते याच कारणासाठी की आज सगळ्यांची भेट होणार. गप्पांची मस्त मैफल रंगली होती. ख्यालीखुशाली, जुन्या आठवणीमध्ये सगळे दंग झाले होते. फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणारे सगळे जुन्या चाळ संस्कृतीच्या अघळपघळ गप्पांची मजा घेत होते. दिलखुलास गप्पा चालल्या होत्या. मीही त्या गप्पांमध्ये सामील होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून जाणारा आनंद टिपत होते.
बटुककाकाने रिसेप्शनचे आमंत्रण सगळ्यांना दिले होते आणि आवर्जून सगळे त्या आमंत्रणाला मान देऊन आले होते. काका-बाबा रात्रीचे आठ वाजले तरी कुठेच हॉलमध्ये दिसले नाही, म्हणूनच बटुककाकाचा फोन आला होता याचे कारण मला उमगले.
जेवण सगळ्यांचं बाकी होतं. गप्पा मारूनच पोट भरलं होतं. नवोदित जोडप्याला शुभेच्छा देऊन सगळे जेवायला गेलो. मेजवानीचा आस्वाद घेत-घेत गप्पाटप्पा अधिकच रंगत होत्या. छान भारावलेले वातावरण होते. काका आणि बाबांना खूप दिवसांनी असं दिलखुलास गप्पा मारताना पाहून मलाही खूप आनंद झाला होता.
जेवणही झालं होतं. ‘आता निघायचं का?’ असं मी काकाला विचारणार तोच आमच्या मजल्यावरील आमचे शेजारी प्रफुल्लकाका समोर येऊन उभा राहिला. काकाला भेटल्याचा काय तो त्याला आनंद झाला होता! प्रफुल्लकाका तर काकाला म्हणाला की “आताच घरी चल.” रात्र खूप झाली होती, त्यामुळे भेटायला येण्याचे काकाने आश्वासन दिले प्रफुल्लकाकाला.
काकाचा आणि बाबांचा दोघांचाही घरी जाण्यासाठी पाय काही हॉलमधून निघत नव्हता. सगळ्यांचा निरोप घेत घेत परत असेच ‘दिल से दिल तक’ भेटून गप्पा मारायचे ठरवून आम्ही निघालो.
या जुन्या सवंगड्यांकडे कुठे त्यावेळी मोबाईल होते की ते आता सारखे व्हॉट्ससपला चिटकून असतात, पण त्यांची त्यावेळची मैत्री खऱ्या अर्थाने मैत्रीचा अर्थ समजून केलेली मैत्री होती आणि अजूनही आहे. खूप वर्षं गाठभेट झाली नाही तरी आजही मनाच्या कोपऱ्यात ती कायमची ताजीतवानी आहे, दिल से दिल तक…!
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068