“आषाढीला काय करायचं आहे उपवासाचं?…ते आधीच सांग, म्हणजे त्याप्रमाणे मला तयारी करून ठेवता येईल.” सासूबाईंच्या या प्रश्नाने आषाढी जवळ आल्याचे प्रकर्षाने जाणवले. गेले काही दिवस कामाच्या गडबडीत भिंतीवरच्या कॅलेंडरकडे लक्षच गेले नव्हते. आज सासूबाईंनी विचारल्यावर मात्र एक नजर कॅलेंडरवर गेली आणि आषाढीच्या आठवणींत रमून गेले. आषाढी – उपवास केला नाही तरी उपवासाचे पदार्थ मात्र चवीचवीने खायचे हा लहानपणापासूनचा नेम. आजी खूप काही पदार्थ बनवायची. घरी सगळ्याच मोठ्या माणसांचा उपवास असायचा. राजगिऱ्याच्या पुऱ्या, बटाट्याची भाजी, वरीची खिचडी आणि दाण्याची आमटी, हा सकाळचा मेन्यू तर संध्याकाळी उपवासाचे थालीपीठ, चटणी, दही, चिकवड्या असा सगळा आवडीचा बेत असायचा.
शाळा सुरू झाल्यानंतर पहिली अर्धा दिवस सुट्टी मिळायची ती आषाढीची. मधली सुट्टी झाली की एक पिरिअड होऊन शाळा सुटायची. सगळ्याच मैत्रिणींच्या डब्यात आवडती साबुदाण्याची खिचडी. कुणाची हिरवी मिरची घालून केलेली, तर कुणी लाल तिखटात केलेली. सगळ्यांच्या डब्यातील एक एक चमचा खिचडी खाण्यात मजा काही औरच होती. आजही खिचडी खाताना ही आठवण हमखास होतेच. शाळा सुटण्याची आतुरतेने मी वाट पाहायचे; कारण घरी गेल्यावर बाबांबरोबर वडाळ्याला आषाढीच्या जत्रेला जायचे असायचे. वडाळ्याला विठुरायाचे देऊळ आहे, मुंबईतील ते प्रतिपंढरपूरच! पंढरपूरला येतात तसा मुंबईचा वारकरी विठुनामाचा गजर करत दिंडी घेऊन येतो. सकाळी दिंडीचा टाळ-चिपळ्यांच्या गजर ऐकू आला की सहदेव काकाबरोबर आम्ही बघायला जायचो. दादरला रानडे रोडवरून नामाचा गजर करत जाणारी दिंडी बघताना तिच्याशी एकरूप कधी व्हायचो ते कळायचेच नाही. संध्याकाळी वडाळ्याला तर खूप साऱ्या दिंड्या दिसायच्या. देवळात अर्थातच खूप गर्दी असायची. बाबा सांगायचे, आता पुढच्या गल्लीत देऊळ आहे; आपण जाणार नाही कारण खूप गर्दी असते तिकडे. जत्रेत फिरून, खेळणी घेऊन घरी परतायचो.
वर्षं सरत गेली आणि काही गोष्टीही बदलत गेल्या. काही वर्षांनी अजित कडकडे यांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रम आषाढीला बघण्याचा नेम सुरू झाला. आषाढी – दिंडी – आणि विठुनामाचा गजर. ‘बोलावा विठ्ठल’ हा आषाढीला होणारा भक्तीरसाचा कार्यक्रम…आम्ही आणि पै कुटुंबीय आजही हा भक्तीगीताचा सोहळा बघतो. वारीची उत्सुकता आणि अप्रूप आजही मनात घर करून आहे. दरवर्षी ठरवते पण ‘योग’ काही येत नाही. यावर्षी सरग सरांनाही त्याबद्दल विचारून झाले, त्यांनी माहितीही दिली. संपदाचे वारीचे फोटो बघून आपण यावर्षीही वारीला जाऊ शकलो नाही, याबद्दल खंत वाटली. ‘एकदा तरी वारी अनुभवावी’ – वर्तमानपत्रात आलेला हा लेख वाचून मनाची हुरहुर अधिक वाढली. अशी माझी आषाढी त्या दिवशी मनात आठवणींची वारी करून येते, पुढच्या वर्षी वारीला नक्की नक्की जायचे हे ठरवून…
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068