पुणे- गायन, वादन, नृत्य यांचा मनोहरी संगम असणाऱ्या केरळोत्सवातील बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी
केरळ संस्कृतीचे दर्शन घडवीत उपस्थितांचे मने जिंकली. या महोत्सवाला पुण्यातील मल्याळी नागरिकांसह
शेकडो पुणेकरांनी हजेरी लावत या महोत्सवाचा आनंद लुटला.
पुणे फेस्टिवल अंतर्गत पुणे मल्याळी फेडरेशनच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘केरळोत्सवाचे’ आयोजन
करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते
दीपप्रज्वलनाने झाले. पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर, फेडरेशनचे अध्यक्ष के.
हरीनारायणन, सरचिटणीस टी. डी. जॉनी, खजिनदार राजन आर. नायर, उपाध्यक्ष शाणी नौशाद, ए. एस.
हमसा, सहसचिव पी. प्रभाकरन, एम. एस. राजा, सह खजिनदार एम. टी. रवींद्रन, विजयन नायर, पी.
रवींद्रन, पद्मनाभन, एम. एन. विजयन, श्रीकांत कांबळे, आदी मान्यवर यावेळी रंगमंचावर उपस्थित होते.
पुणे फेस्टिवलचे माजी मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे यांना प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली.
पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून मुख्यमंत्री सहाय्य निधीस यावेळी २ लाखाचा धनादेश राजन नायर, के.
हरिणारायणन व त्यांच्या सहकार्यांनी गोयल यांच्याकडे सुपूर्द केला.
गणेश वंदनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मोहिनी आट्टम या गांधारी रागावर आधारित
पारंपारिक नृत्याने केरळी संस्कृतीचे, कलेचे दर्शन घडले. ख्रिश्चन समाजाची महानता दर्शविणारे आणि सेंट
थॉमस यांच्या जीवनावरील व केरळमधील कार्यावर आधारित ‘मार्गम कली’, केरळातील मुस्लीम समाजाचे
दर्शन घडविणारा ‘ओपन्ना’ या कार्यक्रमांच्या सादरीकरणाने राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभावाचे दर्शन
घडवीत उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय सर्व वयोगटातील मुलामुलींनी सादर केलेले कुचीपुडी नृत्य,
भारत नाट्यम, कथ्थक, शास्त्रीय नृत्य तसेच ‘लावणी बॅलेट’, ‘सिनेमॅटीक डान्स’, ने उपस्थितांची वाहवा
मिळवली. यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मियांचा एकोपा दाखविणारे नृत्याविष्काराने
प्रेक्षकांना विशेष आनंद दिला.
उद्घाटनपर भाषण करताना पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले, भारतीय विविध
नृत्यांचे प्रकार आहेत. त्याची सुरुवात प्रथम केरळात होते. भारतीय नृत्यकलेत केरळचे योगदान मोठे असून
केरळ समाजाचा अभिमान वाटतो. ‘अनेकता मे एकता, ही आपली विशेषता आहे’. पुणे जिल्ह्यात
केरळमधून रोजगारासाठी, शिक्षणासाठी आलेले विविध समाजाचे चार लाख लोक आहेत. त्यांना पुणे
मल्याळी फेडरेशनच्या माध्यमातून एकत्रित बांधून ठेवण्याचे कार्य हे अभिनंदनीय आहे. पुणे फेस्टिवलच्या
माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने केरळ महोत्सवाचे आयोजन केले जाते. पुणे
फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि स्व. कृष्णकांत कुदळे यांच्या नेटक्या नियोजनामुळे अखंडपणे
३१ वर्षे सुरू असलेल्या पुणे फेस्टीवलचे व्यासपीठ अनेक कलाकारांना मिळाले आणि त्यांना पुढे अनेक
मोठ्या संधी मिळाल्या. केरळ समाजाच्या भविष्याचा विचार करून सर्वांना एकत्रित करण्याचे उत्कृष्ट काम
पुणे मल्याळी फेडरेशन करत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
राजन नायर यांनी पुणे मल्याळी फेडरेशनची माहिती व उद्देश विशद केला. ते म्हणाले, केरळमधून
अनेकजण नोकरी व शिकण्यासाठी पुणे व पुणे जिल्ह्यात येतात.त्यांचा एकमेकांशी परिचय व्हावा हा
उद्देश ठेवून फेडरेशन काम करते. गेल्या १५ वर्षांपासून फेसरीवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी केरळ
महोत्सवासाठी पुणे फेस्टिवलचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे फेडरेशनच्या कामाला अधिक बळ
मिळाले व समाजही एकत्रित आला. स्व. कृष्णकांत कुदळे यांचे नियोजन आणि संघटन कौशल्य यामुळे
आम्हाला खूप उपयोग झाला. त्यांचे नसण्याचे अतीव दुःख होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
के. हरीनारायणन यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात फेडरेशन करत असलेल्या कार्याची माहिती दिली.
ते म्हणाले, पुणे जिल्ह्यात ४ लाख केरळी समाज असून विविध भागात २२ संघटना कार्यरत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता नायर यांनी केले.