पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने जरी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेला जागा सोडण्याची तयारी दर्शवली, तरीही त्याला आमचा प्रखर विरोध राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मनसे आणि एमआयएमला आघाडीमध्ये “नो” एन्ट्री आहे, हे दोन्ही पक्ष आम्हाला चालणार नाहीत, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिले आहे. दुसरीकडे, बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे, अशी आमची इच्छा आहे. यासंबंधीचा प्रस्ताव अॅड. प्रकाश आंबेडकर यांना दिला असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पहात असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खा. चव्हाण बोलत होते. यावेळी माजी खासदार एकनाथराव गायकवाड, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.