भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान , उपमहापौरपदी नवनाथ कांबळे यांची वर्णी
पुणे : पार्लमेंट ते पालिका एकच सरकार स्थापन करण्याचे स्वप्न साकारत आज भारतीय जनता पक्षाने आपला पहिला महापौर पुण्याला दिला. विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सत्तांतर घडवून आणल्याने भाजपला ही संधी लाभली. शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘सुशासन’ व ‘पारदर्शक’ कारभाराची शपथ घेत आज मुक्ता टिळक महापौरपदी विराजमान झाल्या. तर उपमहापौरपदी भाजप रिपाई युतीचे नवनाथ कांबळे यांची वर्णी लागली.
पुण्याच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक आज महानगरपालिकेत पार पडली. भाजपाला बहुमत असल्याने मुक्ता टिळक यांची निवड निश्चित असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नंदा लोणकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेनेने तटस्थ भूमिका बजावली. उपमहापौर पदाच्या लढतीत लता राजगुरू यांनी भाग घेतला परंतु, भाजप व रिपाई युतीमुळे मुक्ता टिळक व नवनाथ कांबळे यांची महापौर व उपमहापौरपदी वर्णी लागली. निवडणुकीपूर्वी शनिवारवाडा ते मनपा भवन अशी भव्य रॅली काढून भाजपच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी मोठ्या उत्साहात सभागृहात प्रवेश केला. यात पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, शहराध्यक्ष योगेश गोगावले, मावळते महापौर प्रशांत जगताप यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी पालकमंत्री बापट म्हणाले की, पक्ष संघटनेच्या जोरावर भारतीय जनता पक्षाला विजय प्राप्त झाला असून पुणेकरांनी ज्या विश्वासाने आम्हाला कौल दिला त्याला कधीच तडा जावू देणार नाही. वरं जनहित ध्येयम या पालिकेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असू. आगामी काळात शहरातील कचरा, पाणी आणि वाहतूक प्रश्न प्राधान्याने सोडविणे हे आमचे प्रमुख ध्येय असेल. पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरण करून लघु व दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असेल. एसआरए सारख्या प्रकल्पाच्या उभारणीतून शहराचे झालेले बकालीकरण दूर करण्याची मोहीम हाती घेण्यात येईल. जाती-पाती, धर्म या राजकारणाच्या पलीकडे जावून शहराचा विकास करु, यासाठी विरोधकांचेही सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा आहे.
ते पुढे म्हणाले की , स्मार्ट सिटी उपक्रमाच्या माध्यमातून शहराचा विकासाला चालना देण्यात महापौरांचा वाटा मोलाचा असेल. मुक्ताताई आपल्या कार्यातून व निर्णयक्षमतेतून शहराच्या प्रगतीला नवी दिशा देतील, असा विश्वास आहे. केंद्र शासन, राज्य सरकार व महापालिका यांच्यात योग्य तो समन्वय साधून पुणेकरांचे प्रश्न मार्गी लावणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याची ग्वाही यावेळी पालकमंत्री बापट यांनी दिली.
नागरी समस्या सोडविण्यासाठी आचारसंहिता : पालकमंत्री बापट
महापालिका सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठे माध्यम आहे. म्हणूनच सर्व लोकप्रतीनिधीसाठी एक आचारसंहिता तयार केली आहे. अभ्यास वर्गाच्या माध्यमातून त्यांची सभागृहातील दैनंदिन उपस्थिती, संपर्क कार्यालये, नागरिकांना सहज भेटीची उपलब्धता, प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी त्यांची तळमळ हे तपासले जाईल. यासाठी पक्ष संघटनेची मदत घेतली जाणार आहे. दर तीन महिन्यांनी याचा आढावा घेण्यात येईल, असे पालकमंत्री बापट यांनी यावेळी सांगितले.