मुंबई. शहरातील भयावह ट्रॅफिक जाम व अडचणीच्या पार्किंग समस्येवर उपाय करण्यासाठी मुंबईमध्ये सरकारला मंत्रालय व राजभवन सहित सर्व सरकारी ठिकाणी सार्वजनिक पार्किंगची सुविधा सुरू केली पाहिजे. भाजपाचे ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढ़ा ह्यांनी विधानसभेत ही मागणी केली व असेही म्हंटले की, मुंबईच्या नियोजनबद्ध विकासासाठी वेगळे मंत्रालयही स्थापन केले जावे.
विधानसभेमध्ये सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर ‘अर्धा तास चर्चेच्या’ अंतर्गत बुधवारी मुंबईतील पार्किंग समस्या, ट्रॅफिक जाम आणि मूलभूत सुविधांच्या विकासाविषयी आपला प्रस्ताव ठेवत आमदार लोढ़ा ह्यांनी म्हंटले की, मुख्यमंत्री मुंबई व महाराष्ट्राच्या विकासासाठी अतिशय पारदर्शितेसह व वेगाने कार्यरत आहेत, मेट्रोचे काम वेगाने होत आहे. परंतु गाड्यांसाठी रस्त्यांवर जागा नाही आहे. तरीही रोज हजारो नवीन वाहनांची नोंदणी होत आहे. परिणामी अनेक तास ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडणे ह्या शहराची सर्वांत मोठी ओळख बनले आहे.
फूटपाथवर पायी चालणा-यांसाठी कुठेच जागा नाही ह्याचाही उल्लेख करून आमदार लोढ़ा ह्यांनी म्हंटले की, मुंबईतून जितका कर वसूल केला जातो, त्यातील फार थोडा मुंबईसाठी वापरला जातो. त्यांनी सरकारकडे मागणी केली की, दीर्घ काळापासून प्रलंबित हाजी अली सर्कलवर फ्लाय ओव्हरचे काम करून बाणगंगावरून रॉकी हिलकडे जाणा-या रस्त्याला तातडीने सुरू करावे. आमदार लोढ़ा ह्यांनी दु:ख व्यक्त केले की, मुंबईमधील पायाभूत सुविधांचा आराखडा बनवणा-या नाना जगन्नाथ शंकरशेठ ह्यांच्या नावे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या नामकरणाची फाईलही सरकारी विभागामध्ये अडकून पडली आहे आणि ह्याहून अधिक दुर्लक्ष योजनांकडे केले जाऊ शकत नाही. मुंबईच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी करत आमदार लोढ़ा ह्यांनी सरकारकडे मागणी केली की, मुंबईला वाचवण्यासाठी तत्काळ उपाय केले जावेत. त्यांनी म्हंटले की, जर मुंबईच्या सुनियोजित विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय बनवले तर फक्त मुंबई शहरच नाही तर राज्याचा विकासही अधिक वेगाने होईल.