पुणे-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी राज्यातील ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पुणे लोकसभेसाठी अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर मावळ लोकसभा मतदारसंघातून राजाराम पाटील आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून नवनाथ पडळकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.यातील बहुसंख्य उमेदवारांची नावे अल्पपरिचित असल्याने आता या उमेदवारांची मदार प्रचार यंत्रणा आणि खुद्द आंबेडकर -ओवेसी यांच्या सभांवरच अवलंबून असणार आहे .मनसेच्या राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते,पण मनसेला त्या प्रमाणात मतदान होत नाही . आता या दोघांच्या सभांनी मतदानात काय आणि कशाप्रके उत्साह किंवा परिवर्तन होईल हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ११ मतदारसंघ वगळता उर्वरित ३७ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्याअंतर्गत पुण्यातून अनिल जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि शेतकरी असलेले अनिल जाधव राज्यातील वडार सामाजिक संघटनेचे तरुण नेते असून, गेल्या १२ वर्षांपासून विविध सामाजिक कामात सहभागी आहेत. ते पुणे जिल्हा येरवडा मध्यवर्ती कारागृह अभिविक्षक समितीचे माजी सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षातही ते कार्यरत होते. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत जानेवारीत पिंपरी येथे झालेल्या सभेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. येणाऱ्या काळात वंचितांची ताकद दाखवून देऊ, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला होता.
उमेदवारीवरून चर्चेला उधाण
अॅड. आंबेडकर यांनी कोल्हापूर येथील सभेत वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेसाठी विठ्ठल लक्ष्मण सातव यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. मात्र, शुक्रवारी अचानक वंचित बहुजन आघाडीतर्फे पुणे लोकसभेसाठी अनिल जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे खुद्द प्रकाश आंबेडकरांनी घोषणा करून अंतिम उमेदवार यादीत विठ्ठल सातव यांचे नाव नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.