पुणे :लेखक, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे माजी उपाध्यक्ष फिरोज अश्रफ यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी , शनिवारी – १५ जुन रोजी सभा आयोजित करण्यात आली होती.
शनीवारी संध्याकाळी ६ वाजता, गांधी भवन,( कोथरूड , पुणे ) येथे ही सभा झाली.
अन्वर राजन ( सचिव , महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ), कलीम अजीम ( कार्यकारी संपादक , सत्याग्रही विचारधारा ), संदीप बर्वे ( कार्यवाह, युवक क्रांती दल ) , डॉ. मल्लीका मिस्त्री,आदी मान्यवर सहभागी झाले.
‘ अश्रफ हे दिलदार स्वभावाचे होते. ‘ सुरभी ‘ सारख्या मालिकेचे लेखनाचे वैशिष्टयपूर्ण काम केले.सामाजिक सलोखा, संवादासाठी अश्रफ यांनी आयुष्यभर काम केले. हे काम पुढे नेले पाहिजे ‘, असे संदिप बर्वे म्हणाले.
कलीम अझीम म्हणाले, ‘ पाकिस्ताननामा ‘ सारखे सदर लिहिणारे फिरोज अश्रफ हे अभ्यासू व्यक्तिमत्व होते. भारतीय मुस्लीमांची समाजरचना त्यांनी भारतीय दृष्टीकोणातून केली. धर्मनिरपेक्षता आणि अल्पसंख्य हे दोन शब्द या लोकसभा निवडणुकीत उच्चारण्यातच आले नाहीत.
अशा पाश्र्वभूमीवर दोन समाज संस्कृती, दोन राष्ट्र यांच्यातील संवाद समजून घेण्याचा फिरोझ अश्रफ यांचा विचार आजच्या काळात महत्वाचा ठरणार आहे.
डॉ.मल्लीका मिस्त्री म्हणाल्या , ‘फिरोझ अश्रफ हे फक्त विचारवंत नव्हते, तर,खऱ्या तळागाळात सामान्य माणसांसाठी कार्यरत व्यक्ती होते. आता भोवतालच्या समाजाची जी घसरण चालली आहे, भय वाढले आहे.ती पाहून चिंता वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर अश्रफ यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवणारी आहे.
डॉ. अंजली सोमण म्हणाल्या, ‘ अश्रफ यांचे व्यक्तीमत्व वैचारिक आणि सामंजस्य मानणारे होते. समाजापासून न तुटता जगणारा विद्वान कसा असावा, याचे मूर्तीमंत उदाहरण त्यांच्या रुपाने पाहायला मिळाले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अन्वर राजन म्हणाले, ‘ फिरोझ अश्रफ हे विस्थापितांच्या वेदनांचे प्रतिनिधी होते. फिरोज अश्रफ यांच्या लिखाणात मुस्लीमांच्या वाट्याला आलेल्या अनुभव आणि व्यथांचे विश्लेषण आहे. ते बहुसांस्कृतिक माणसाचे चित्र प्रादेशिक भाषेत मांडत असत. मुंबई दंगलीच्या काळात उपनगरात विस्थापित झाल्यावरही दुःख न मानता त्यांनी सामाजिक काम केले. धर्मनिरपेक्ष, मानवतावादी विचार पुढे नेणारा उमदा विचारवंत आपण गमावलेला आहे. ज्या विचाराच्या आधाराने त्यांनी काम केले, ते काम पुढे नेणे, हीच श्रध्दांजली ठरेल.