माणुसकीची हत्या थांबवली पाहिजे : डॉ.कुमार सप्तर्षी
पुणे :श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निरपराधांना गांधी भवन येथे आयोजित सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
ही श्रध्दांजली सभा गांधी भवन , कोथरूड , पुणे येथे २९ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी सहा वाजता झाली.
या सभेत आशीष जेम्स ( सहसंस्थापक, द न्यु क्रिएशन्स आणि विश्वस्त , दीपगृह संस्था ), प्रा. परिमल माया सुधाकर ( जागतिक घडामोडींचे अभ्यासक ), संदीप बर्वे आणि अन्वर राजन , (सचिव , गांधी भवन ) सहभागी झाले.
युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ.कुमार सप्तर्षी या सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
‘ आपले आणि आपले नसलेले ‘ असा भेदच दहशतवादाला प्रोत्साहन देतात. जिहाद कडे तरुण आकृष्ट का होतात, याचा अभ्यास केला पाहिजे. मानवतेला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन आशीष जेम्स् यांनी केले.
‘कट्टरवादाचे अस्तित्व दाखवण्यासाठी दहशतवादी हल्ले होतात, असे नाही, तर त्या मागचा उद्देश ओळखला पाहिजे. जिहादी तरुणांना आकृष्ट करणे, हाही दहशतवादी संघटनांचा उद्देश असतो. या हल्ल्यानंतर श्रीलंकेत बाहेरील देशांचा हस्तक्षेप वाढू शकतो, श्रीलंकेचे सरकार याकडे कसे पाहते, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत.आत्मबलिदानाच्या वाटेवरील तरुणांना परत कसे वळवता येईल, याकडेही लक्ष दिले पाहिजे.‘, असे प्रा. परिमल माया सुधाकर यांनी सांगितले.
या हल्ल्याने फक्त श्रीलंकाच नाही, तर जगातील मानवतावाद्यांसमोर आव्हान उभे केले आहे. या आव्हानाचा सर्वांगीण विचार करण्यासाठी ही सभा आयोजित केली, असे संदीप बर्वे यांनी सांगितले.
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ धर्माकडे वळणाऱ्या व्यक्ती मानसिकदृष्टया असुरक्षित असतात.वर्चस्ववादाच्या राजकारणातून दहशतवादी हल्ले होतात.मरणाचे दैवतीकरण, उदात्तीकरण होता कामा नये. गरीबी नष्ट केली नाही तर मरण विकत घेणारे वाढतात. धर्माच्या नावाने होणारा वाह्यातपणा वाढू देता कामा नये.एकात्मता वाढवणारे उपक्रम वाढवले पाहिजे.भारतात आपण सजग राहिलो, तर सर्व जगासाठी उत्तर शोधू शकू . माणुसकीची हत्या थांबविली पाहिजे.