देशातील अघोषित आणीबाणी विरुद्ध लढण्याची गरज : यशवंत सिन्हा
ऑगस्ट क्रांती दिनी डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित
पुणे :’ देशात अघोषित आणीबाणी आहे,संसदीय व्यवस्थांचे , संस्थांचे सरकारकडून अवमूल्यन केले गेले आहे, सर्वांना भीतीच्या वातावरणात ठेवण्यात येत आहे . राजकीय विरोधकांना बदनाम करून संपवण्यात येत आहे. या अघोषित आणीबाणी विरुद्ध लढले पाहिजे आणि देश जिवंत आहे, हे दाखवून देण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन आज माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केले.
‘ मोदींवर बोलण्याऐवजी मुद्यांवर इथुन पुढे बोलले पाहिजे.पुण्याने देशाला दिशा द्यावी आणि बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करण्यात पुढाकार घ्यावा, नागरिक म्हणून आता गप्प राहता कामा नये. सव्वाशे कोटी जनतेने मनात आणले तर १९७७ सारखे निकाल येऊ शकतात ,असेही ते म्हणाले.
ते डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक युवक क्रांती दल) लिखित ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकाच्या तिसर्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.
हा कार्यक्रम आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी सायंकाळी ६ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे पार पडला.
क्रांती दिन आणि युवक क्रांती दलाच्या १७ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, ‘युवक क्रांती दल’ आणि ‘प्रफुल्लता प्रकाशन’ यांच्या संयुक्तविद्यमाने या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंत सिन्हा म्हणाले, ” आणीबाणी विरोधी आंदोलनात डॉ. सप्तर्षी यांची भूमिका महत्वाची होती.आज पुन्हा तशीच परिस्थिती आहे. मागील वेळच्या आणीबाणीला संविधानाचा आधार होता.पण, आता चतुराईने अघोषित आणीबाणी राबवली जात आहे.
संसदीय व्यवस्था, तपास व्यवस्था, माध्यमे ताब्यात घेऊन नाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आताच्या आणीबाणीत धर्मवाद ( सांप्रदायिकता )आहे. अनेक व्यवस्था शरण गेल्यासारखी अवस्था आहे.
कॅबिनेट मंत्रीमंडळ व्यवस्थेची दुर्दशा झालेली आहे, असे सांगून सिन्हा यांनी उदाहरणे दिली. सरकारमधल्या क्रमांक दोनच्या मंत्र्याला , केंद्रीय गृहमंत्र्याला महबुबा मुक्ती सरकारचा पाठिंबा काढल्याची माहिती नसते. नागा विषयक कराराची माहितीही गृहमंत्र्याला नव्हती. परराष्ट्रमंत्र्यांना परदेश दौऱ्यात, कामकाजात सामावून घेतले जात नाही. त्यांचे अशोभनीय भाषेत ट्रोलिंग केले जाते. अर्थमंत्र्यांना नोटा बंदीच्या निर्णयाची माहिती नव्हती. राफेल निर्णयाची माहिती संरक्षण मंत्र्यांना नसते. कॅबिनेट व्यवस्था ‘ग्रुप ऑफ ऑर्डर्ली ‘ झाली आहे. एकच जण निर्णय घेत आहे, त्याचे श्रेय -अप श्रेय घेत आहे.
माध्यमांवरही अघोषित बंधने आहेत. भाजपा कार्यालयातून निर्देश सुटतात. पुण्यप्रसून वाजपेयी एबीपी न्यूज मधून काढण्यात आल्यावर त्यांचे म्हणणे माध्यमांनी मांडले नाही.पत्रकारांना आपल्या मुलाबाळांची काळजी वाटते, म्हणून ते आमचे म्हणणे छापू शकत नाहीत, असे मला दिल्ली पत्रकार परिषदेनंतर सांगण्यात आले.
पंतप्रधानांसमोर माध्यमांनी लोटांगण घातले आहे.दुसऱ्याच्या ‘ मनची बात ‘ ऐकायला पंतप्रधानांना वेळ नाही.
संसद व्यवस्थेला असहाय अवस्थेत पोहोचवण्यात आले आहे. संसद आता अल्पकाळ चालवली जाते. आताचे पावसाळी अधिवेशन केवळ १८ दिवस चालले.
न्यायव्यवस्थेलाही आपल्या मर्जीने नाचवले जात आहे.ईव्हीएम यंत्राविरुद्ध निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षांची मागणी आहे. गुजरात, हिमाचल चे निकाल तारीख ठरवण्याची बाब संशयास्पद आहे. निवडणूक आयोग निःपक्ष काम करेल याची शक्यता कमी आहे.
रिझर्व्ह बॅंकेलाही नोटा बंदी प्रकरणात वाकवण्यात आले. आताच्या दोन नेमणूकांवरुन या व्यवस्थेचेही अवमूल्यन झाल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ पुस्तकाबाबत आपले विचार व्यक्त केले.
अप्पा अनारसे, सचिन पांडुळे,जांबुवंत मनोहर, सुदर्शन चखाले, रवींद्र धनक,रवी लाटे, व्यासपिठावर उपस्थित होते.
या प्रसंगी सभागृहात आमदार जयदेव गायकवाड, डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. विश्वंभर चौधरी, संजय बालगुडे, अन्वर राजन (महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव), संजय बालगुडे, आदी उपस्थित होते
युक्रांद ‘ चे सचिव संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमेला यशवंत सिन्हा , डॉ.कुमार सप्तर्षी यांनी अभिवादन केले.
ही तिसरी आवृत्ती ‘प्रफुल्लता प्रकाशन’ यांनी प्रकाशित केली आहे.
पुस्तकाविषयी माहिती देताना डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘१९७० च्या दशकात अनेक सामाजिक आंदोलनानंतर तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवास ही इष्टापत्ती मानून तुरुंगात आलेले अनेक अनुभव, वाचन, चर्चा आणि त्यांचा आयुष्यावर झालेला परिणाम याबाबत चे लेखन ‘येरवडा विद्यापीठातील दिवस ‘ या पुस्तकात आहे.’
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ यशवंत सिन्हा, आणि माझे गुरू हे जयप्रकाश नारायण होते. म्हणून प्रकाशन समारंभाला त्यांनी पाचारण केले. आज सर्व जातींचे लष्करीकरण होऊ पाहत आहे. महाराष्ट्रात मराठा समाज अग्रदूत आहे. त्यामुळे आजचे आंदोलन हिंसक होईल, किंवा आमच्या कार्यक्रमात अडथळा येईल असे वाटत नव्हते. तसेच झाले, आणि निर्वेध पणे कार्यक्रम पार पडला.
देशात फॅसिस्ट राजवट असल्यासारखे वातावरण आहे, अशावेळी सत्याग्रहाच्या मार्गाने लढले पाहिजे. हे केंद्रातील सरकार गेले पाहिजे, या भूमिकेपर्यंत आम्ही आलो आहोत. काँग्रेसला भाजप विरोधी लढाई पेलवत नसेल तर सर्व भाजप विरोधी विचारांनी एकत्र यायला हवे.
डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, ‘ येरवडा विद्यापीठातील दिवस ‘ हे पुस्तक युक्रांद कार्यकर्त्यांसाठी पाठयपुस्तक आहे. व्यवस्थेच्या प्रतिनिधी असणारे मंत्री, पोलिस, जेलची भीती घालवण्याचे काम या पुस्तकाने केले. मराठी साहित्यातील हे महत्वाचे पुस्तक आहे. आताच्या काळात परिवर्तनाच्या प्रक्रियेत हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.