पुण्याच्या पालकमंत्र्यांना कचरा प्रश्नाचे गांभीर्य नाही :काँग्रेस पर्यावरण विभाग प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे यांची टीका
पुणे :‘पुण्याच्या पालकमंत्र्यांना कचरा प्रश्नाचे गांभीर्य नाही ,आता आयुक्त पातळीवर आणि रस्त्यावर आंदोलन करून पुण्याच्या कचरा प्रश्नावर तोडगा काढायला भाग पाडू ‘असा इशारा काँग्रेस पर्यावरण विभागाच्या प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे यांनी प्रदेश कार्यकारिणी बैठकीत दिला .
ही बैठक हॉटेल ‘डेक्कन एट ‘ भांडारकर रस्ता ,पुणे येथे रविवारी दुपारी झाली . त्यानंतर अशोक मोरे यांनी पत्रकारांना प्रदेश कार्यकारिणी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली .
राज्यातील महत्वाच्या पर्यावरण समस्यांच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा ठराव काँग्रेस पर्यावरण विभाग प्रदेश कार्यकारिणीत करण्यात आला .
अशोक मोरे म्हणाले ,’पुण्याच्या कचरा प्रश्नाला सत्ताधारी पक्षाने बाजूलाच ठेवले आहे . उरळी येथे डम्पिंग चालू आहे . पुण्याच्या कचरा व्यवस्थापन प्रश्नी आता चर्चाही होत नाही आणि मार्गही काढला जात नाही . तसेच अजूनही सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे . पालकमंत्र्यांना पुण्याच्या पालकमंत्र्यांना कचरा प्रश्नाचे गांभीर्य नाही आता आयुक्त पातळीवर ,रस्त्यावर आंदोलन करून पुण्याच्या कचरा प्रश्नावर तोडगा काढायला भाग पाडू’
‘पिंपरी पालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी घेतलेली हिंजवडीतील जागा बिल्डरांच्या दबावामुळे वापरली जात नाही .त्यामुळे तेथे कचरा समस्या आहे . राज्यातील तिवरांची जंगले वाचविणे ,वृक्षतोड रोखणे ,जलपर्णी निर्मूलन ,मल निःस्सारण प्रक्रिया ,नदी स्वच्छता प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पर्यावरण विभाग आता रस्त्यावर उतरणार आहे . ‘
प्रदेश सरचिटणीस तेजेंद्रसिंह अहलुवालिया म्हणाले ,’भाजप सरकारने गंगा नदी शुद्धीकरणासाठीचा खरेच किती वापरला याचे उत्तर जनतेला द्यावे . भाजप सरकारचे पर्यावरणीय समस्यांवर स्वतःचे काहीच व्यवस्थापन नाही . पुणे कॅन्टोनमेंट,खडकी कॅन्टोन्मेंट येथेही कचरा व्यवस्थापन शून्य आहे . ‘
या प्रदेश बैठकीला तेजेंद्रसिंह अहलुवालिया (प्रदेश सरचिटणीस ) पराग आठवले (प्रदेश सरचिटणीस ),राजन पानसे (पुणे शहराध्यक्ष ),वैशाली परदेशी (पुणे शहर उपाध्यक्ष ) ,राज्यातील जिल्हाध्यक्ष ,कार्यकारणी सदस्य उपस्थित होते . पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली . ‘राहुल फॉर इंडिया ‘ पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .