पुणे
पंढरीच्या वाटेवर वर्षेनुवर्षे वारी करणाऱ्या वारकरी बांधव -भगिनींना आता स्वच्छतेचे महत्व पटले आहे. गेली चार – पाच वर्षे स्वयंसेवकांनी घेतलेले अथक परिश्रम आणि जनजागृतीमुळे आता निर्मल वारी उपक्रम यशस्वी ठरला आहे . अनेक गावांनीही स्वच्छतेची कास धरली आहे. शासनानेही तात्पुरती आणि फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून दिल्याने स्वच्छतेसाठी आपुलकीची ‘सक्ती’ हीच विठू भक्ती याचा प्रत्यय मिळत आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संतशिरोमणी तुकाराममहाराज पालखी सोहळय़ामध्ये ‘निर्मल वारी अभियान’ राबविण्याचा प्रयोग आता यशस्वी ठरला आहे. मात्र सुरुवातीला उपक्रमासाठी कोणते अडथळे आले, गावांचा प्रतिसाद कसा होता , ग्रामस्थांची भूमिका काय होती याबाबत या उपक्रमात प्रारंभीपासून अग्रेसर असणारे व भाजपचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे म्हणाले कि यवत आणि लोणी गावांमध्ये या निर्मल वारीचा प्रयोग करण्याचे चार वर्षांपूर्वी माजी खासदार प्रदीप रावत यांच्या संकल्पनेतून ठरले. मोतीबागेत झालेल्या बैठकीत तत्कालीन प्रांत कार्यवाह अतुल लिमये आणि मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि आम्ही शंभर महिला आणि शंभर पुरुष या गावांमध्ये पोहचलो.वारकरी प्रातर्विधीसाठी कोणत्या ठिकाणी जातात ती ठिकाणे निश्चित केली आणि त्या ठिकाणी तात्पुरते शौचालये उभारून त्याचा वापर करण्यास उद्युक्त केले. रात्री बारा पासून ते पहाटेपर्यंत आम्ही कार्यरत होतो. प्रारंभी ग्रामस्थांनी राजकीय दृष्टिकोनातून या उपक्रमाकडे पाहिले आणि आमच्या भूमिकेवर संशय घेतला मात्र आम्ही
दरवर्षी आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदी आणि देहू येथून प्रस्थान ठेवणाऱ्या पालख्यांसमवेत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी रवाना होत आहेत. वारीमध्ये पुरुष आणि महिला वारकऱ्यांची संख्या खूप असते. जास्त दिवसांचा प्रवास असल्यामुळे पालखी सोहळा मार्गावरील वेगवेगळय़ा गावांमध्ये मुक्काम करतो. प्रातर्विधीसाठी गावामध्ये शौचालयांची सोय नसल्यामुळे अनेकांना उघडय़ावरच शौचास बसावे लागते. त्यामुळे या गावाजवळचा परिसर दूषित होत असतो. त्यामुळे परिसरामध्ये विविध आजारांची लागण होत असते.आणि अनेक कुटुंबे काही कालावधीसाठी गावे सोडून दुसरीकडे राहण्यास जातात हे निदर्शनास आणून देताना हे टाळण्यासाठी हा उपक्रम किती उपयुक्त आहे हे ग्रामस्थांना पटवून दिले,पुढे या उपक्रमाची व्याप्ती वाढत गेली.ग्रामस्थांचा सहभाग वाढत गेला. यवत गावात यशस्वी झालेल्या या प्रयोगाचे रिपोर्टींग शासनापर्यंत पोहचवले आणि शासनाने त्यासाठी पुढाकार घेत कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून दिला.
वारी मुक्कामाच्या प्रत्येक गावामध्ये राज्य सरकारतर्फे तात्पुरती आणि फिरती शौचालये उपलब्ध करून दिल्याने निर्मल वारी यशस्वी ठरत आहे. हजारो स्वयंसेवकांनी वारकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. प्रारंभी वारकऱ्यांचा प्रातर्विधीसाठी पैसे मोजावे लागतात असा समज होता,माऊली … माऊली करून त्यांना निशुल्क असल्याचे आणि सर्वांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचे याचे केलेले प्रबोधन आज यशस्वी ठरले आहे. अनेक संस्थांचा सहभाग वाढल्याने स्वच्छतेसाठी आपुलकीची ‘सक्ती’ हीच विठू भक्ती हा गजर खऱ्या अर्थाने प्रभावी ठरल्याचे बाळासाहेब अमराळे यांनी नमूद केले.
… स्वच्छतेसाठी कंत्राटदारांवर हवी सक्ती !
निर्मल वारी अभियानाला शासनाने गती देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने आता अनेक गावांमध्ये तात्पुरती आणि फिरती शौचालये उभारली जातात मात्र आता ठिकाणे निश्चित झाली आहेत. त्याठिकाणी चौथरा उभारून तसेच लगतची जागा सिमेंट क्रॉंक्रीटीकरण करून शौचालये उभारणे आवश्यक आहे. वारी कालावधीत पाऊस असतो आणि चिखल मोठ्याप्रमाणावर होत असल्याने ;तसेच जागा समतल नसल्याने शौचालये हलत असतात. त्यात आता टेंडरपद्धतीने स्वच्छतेचे कंत्राट दिले जाते मात्र ज्यावेळी शौचालयांचा वापर होतो त्यावेळेची स्वच्छता महत्वाची असते. पाणी उपलब्ध आहे कि नाही, टँकर पोहचला कि नाही आणि मैला वेळेवर उचलला जातो कि नाही याकडे मात्र दुर्लक्ष संबंधित कंत्राटदाराकडून होत असल्याने नाहक वारकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो शिवाय या उपक्रमावर त्याचा विपरीत परिमाण होईल याची भीतीही आम्हा स्वयंसेवकांना असते. त्यामुळे स्वच्छतेसाठी दिरंगाई केल्यास कंत्राटदारावर दंडाच्या रूपाने कारवाई व्हावी अशी अपेक्षाही बाळासाहेब अमराळे यांनी व्यक्त केली.