औरंगाबाद- एमआयएम पक्षाचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील अडचणीत येण्याची शक्यता आहे. जलील यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. धर्माच्या नावावर मते मागितल्यामुळे इम्तियाज जलील यांचे सदस्यत्व रद्द करण्याची आणि त्यांना निवडणुकीतून अपात्र ठरवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
धर्माच्या नावावर मते मागणे, प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्ह्याची कलमे लपवणे आणि खर्चाचा हिशोब न मांडणे या कारणावरून याचिका दाखल झाली. शेख नदीम शेख करीम या लोकसभेतील पराभूत उमेदवाराने याचिका दाखल केली आहे. धर्माच्या नावावर मते मगितल्याच्या सीडी आणि इतर पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. या पुराव्यांमुळे इम्तियाज जलील यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
जलील यांनी औरंगाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार चार वेळेसचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. चार वेळेस निवडणूक जिंकलेल्या खैरेंना पराभव जिव्हारी लागला होता, त्यातच आता अपक्ष उमेदवाराने जलील यांच्यावर विविध आरोप करत याचिका दाखल केली आहे. प्रतिज्ञापत्रात स्वतःवर असलेले गुन्हे सार्वजनिक करणे उमेदवाराला अनिवार्य आहे, तसेच याबाबत सुप्रीम कोर्टाचेही आदेश आहेत. इम्तियाज जलील यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास सदस्यत्व रद्द होऊ शकते.