मुंबई : लोकसभा निवडणुकीत आज भाजप आणि सेनेकडून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी चे पानीपत झालेले पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघापैकी 41 लोकसभा मतदारसंघात युतीने यश मिळवले असून. यापैकी शिवसेनेचा जवळपास 18 जागांवर विजय निश्चित झाला आहे असला तरी त्यांचे पराभूत झालेल्या पाच उमेदवारांपैकी चार उमेदवार हे केंद्रीय मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. यामुळे राजकीय वर्तुळाने याची विशेष नोंद घेतली आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर विद्यमान केंद्रीय मंत्री अनंत गिते हे निवडणूक लढवत होते, त्यांचा राष्ट्रावादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केल्यामुळे ते मंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
दुसरे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले चंद्रकांत खैरे हे तब्बल तीनवेळा लोकसभेवर निवडून आल्यामुळे त्यांनाही मंत्रीपदाची संधी दिली जाण्याची शक्यता होती, परंतु, त्यांचाही वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे तिसरे मंत्रीपदाचे दावेदार हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तीनवेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव होते. परंतु त्यांचाही राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हेनी पराभव केला आहे. तसेच, शिवसेनेचे मंत्रीपदाचे चौथे प्रबळ दावेदार हे अमरावतीचे आनंदराव आडसूळ हे होते. परंतु, त्यांचाही आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी पराभव केला आहे.
मंत्रीपदाचे शिवसेनेच्या चारही प्रबळ दावेदारांचा पराभव झाल्याने आता मात्र केंद्रात मंत्रीपद कोणाला दिले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेना हा भाजपचा जुना आणि महत्वाचा मित्रपक्ष असल्याने केंद्रात शिवसेनेचे मंत्रीपद फिक्स आहे. तसेच, 2014ला शिवसेनेच्या अनंत गिते यांना मंत्रीपद दिले गेले होते ती जागा आता रिक्त होणार असल्याने शिवसेना कोणत्या खासदाराला मंत्रीपद देणार याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे.