पुणे- महापालिकेतील स्थायी समिती आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यातील सुप्त संघर्ष आज अचानक उफाळून आला . आणि स्थायी समिती ने नगरअभियंता ,पाणीपुरवठा प्रमुख यांच्यासह १२ आधिकाऱ्यांना स्थायी सभागृहाचे दरवाजे बंद केले .स्थायी समितीची बैठक सुरु असताना हे दरवाजे बंद करण्यात आले त्यामुळे थोडा वेळ प्रतीक्षा करून अखेर या अधिकाऱ्यांनी आपआपल्या कार्यालयात माघारी पावले वळविली .
आज महापालिकेतील स्थायी समितीची बैठक सुरु झाल्यावर अनेक अधिकारी अनुपस्थित होते ते पाहून स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसचिव यांनी दोहोंनी हे दरवाजे बंद केले . आधिकाऱ्यांना वेळेची किंम्मत कळली पाहिजे . वेळेवर त्यांनी बैठकांना हजर राहिले पाहिजे असा सूर लावला गेला .
तर दुसरीकडे अधिकाऱ्यांना दरवाजे बंद केल्याने अधिकाऱ्यांमध्ये देखील रोष पसरला . वेळेवर येवून आम्ही 2 / 2 तास बसून राहतो ,तरी स्थायी ची बैठक सुरु होत नाही .अनेक वेळा स्थायी अध्यक्षांच्या अँटीचेंबर मधील बैठकीपुर्वीची खलबते लांबतात आणि अधिकाऱ्यांना प्रतीक्षेत ताटकळत बसावे लागते .येथे हवे तर चालू स्थितीतील सीसीटीव्ही लावा. बैठका नेमक्या किती वाजता सुरु होतात ते पहा . आणि शासनाचे आदेश हि तपासा , शासनाने याबाबत काढलेल्या आदेशाकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे ,अर्धा तास उशीर झाला की नगरसचिवांनी बैठक तहकूब करावी असे म्हटले आहे. पण नगरसचिव हे स्थायी अध्यक्षांच्या दबावाखाली काम करतात .असा सूर आज अधिकाऱ्यांमध्ये होता.
एकंदरीत स्थायी समिती आणि महापालिका अधिकारी यांच्यात असलेला वर्षानुवर्षांचा हा सुप्त संघर्ष आज स्थायी समिती ने घेतलेल्या ‘दरवाजे बंद ‘ च्या निर्णयाने उफाळून आला आहे .
आज दरवाजे बंद झाल्यानंतरही आयुक्त बैठकीला गेले मात्र त्यांच्यासाठी दरवाजे उघडले गेले .