पुणे- महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप नगरसेवकाची आपल्या भागातील पाणी प्रश्नावरून झालेली फरफट आणि उद्विग्नता या नगरसेवकाने आज पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांसह ,नगर अभियंता आणि सभागृहनेता यांना पत्र देवून स्पष्ट केली आहे . या पूर्वी आपल्या भागातील पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नव्या बांधकामांना परवानगी देवू नये अशा आशयाची न्यायालयीन स्थगिती या नगरसेवकाने मिळविली होती आता विश्वासघात झाल्याची भावना झाल्याने पुन्हा अशाच पद्धतीची जणू पुन्हा लढाईची तयारी या नगरसेवकाने केली आहे .मे महिन्याच्या मुख्य सभेत या नगरसेवकाने एकदा प्रशासनाच्या ढिलाई विरोधात आणि गटनेत्यांच्या छुप्या युती बद्दल आवाज उठवला होता . ‘फक्त पुढच्या रांगेत बसणाऱ्यांची कामे होतात , मागच्यांची कामे होत नाहीत .असे म्हणत आम्ही काय नुसतेच नेत्यांच्या इशाऱ्यावर हात वर करायला निवडून आलोत काय ? अशा आशयाचा सवाल त्यांनी मुख्य सभेत उपस्थित केला होता यामुळे या नगरसेवकास भाजपच्या नेत्यांनी कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती .
अमोल रतन बालवडकर असे या सत्ताधारी भाजपा नगरसेवकाचे नाव आहे ते बाणेर बालेवाडी तून निवडून आलेले आहेत . त्यांनी आज महापालिकेच्या नगर अभियंत्यांना पत्र दिले आहे .या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि ,
२०१५ मध्ये मी बाणेर बालेवाडी येथील पाणीप्रश्ना बाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती . या याचिकेत बाणेर बालेवाडी परिसरातील २५० सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष पाण्याच्या टंँकर वर होणारा खर्च याचा लेखजोखा मांडला होता . मागील वर्षी २०१७ मध्ये न्यायालयाने याचिकेची दखल घेवून येथील नवीन बांधकामांना स्थगिती दिली होती व जोपर्यंत येथील पाणी प्रश्न सुरळीत होत नाही . तोपर्यंत पालिकेने या भागात नवीन बांधकामांना भोगवटा पत्र व पूर्णत्वाचा दाखला देवू नये असे आदेश दिले होते . परिणामी या परिसरात 6 ते 8महिने बांधकामांवर स्थगिती राहिली . त्यावेळी आयुक्त आणि शहर अभियंता ,सभागृह नेते ,यांनी मला स्थगिती उठावी यासाठी आग्रह केला आणि सहकार्य करा असे म्हटले . यावेळी येथील पाणी प्रश्न सोडवा, म्हणजे मी सहकार्य करतो, असे मी सांगितले . तेव्हा येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी या तिघांनी मला आश्वासन दिले .आणि म्हणूनच मी सकारात्मक विचाराने ,सहकार्याच्या भूमिकेतून उच्च न्यायालयात मी पालिकेला सहकार्य केले . त्यानंतर पालिकेच्या वतीने अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचे नवे कनेक्शन ,पंपिंग हाऊस,वाढीव पंप ,असे अनेक प्रयत्न करून अनेक सोसायट्यांचा पाणी प्रश्न संपुष्टात आला असे तत्क्षणी जाणवले . त्यामुळे माझे आणि नागरिकांचे समाधान झाले . अनेकांनी पाणी प्रश्न सुटल्याबद्दल माझे अभिनंदन केले. …..
परंतु गेल्या सहा महिन्यापासून बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न पुन्हा नव्याने सुरु झाल्याचे मला नागरिकांच्या तक्रारीवरून जाणवत आहे .याबाबत मी वारंवार पाणी पुरवठा प्रमुख ,मुख्य अभियंता यांना विनवण्या ,तक्रार अर्ज करून देखील माझ्या भागातील पाणी प्रश्न सुटत नाही असे दिसते आहे . माझ्या सोबत व या भागातील नागरिकांसोबत महापालिकेने विश्वास घात केला आहे . याबाबत मला लोकप्रतिनिधी म्हणून खूप मनस्ताप मला होतो आहे . म्हणून मी पुन्हा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहे .
जोपर्यंत पाणी प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत येथे नवीन बांधकामांना भोगवटा पत्र व चालू बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला देवू नये.
अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे .