पुणे- महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी कंबर कसली असून ‘केंद्रात तू’ आणि ‘राज्यात मी’अशी वाटणी विसरून आणि कोणत्याही परिस्थितीत पुणे आणि पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादीची ताकद मजबूतच ठेवायचीच या उद्दिष्टानेच हे दोघे हि रणांगणात उतरत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. एकीकडे असे चित्र असताना काँग्रेस मध्ये मात्र नेतृत्वाअभावी प्रत्येकाला आपापली जबाबदारीच पार पाडण्याकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे . म्हणजे आपापले सिट .. आपली उमेदवारी आणि विजय याकडेच लक्ष द्यावे लागणार आहे . कलमाडी नेतृत्वाच्या अस्तानंतर कलमाडींचे तारुही जणू भटकले आहेत .माजी मंत्री चंद्रकांत छाजेड जणू कालबाह्य झालेत असाच पक्षात सूर लावला जातो आहे. रणपिसे शिवरकर जोडी देखील प्रभावशाली उरल्याचे कोणी सांगत नाही . मोहन जोशी स्वतःच कार्यकर्ते आहेत ,आबा बागुल हे स्वतः आणि मुलाच्या भवितव्याच्या बाहेर पाहणार काय ? असा सवाल उपस्थित केला जातो आहे . आणि आता तर दीपक मानकर देखील काँग्रेसमध्ये नाहीत , कलमाडींचे अन्य तारू देखील फारश्या ठीक राजकीय मजबुतावस्थेत नाहीत. काँग्रेस चे नेतृत्व पृथ्वीराज चव्हाण ,हर्षवर्धन पाटील आणि विश्वजित कदम,यांच्याकडे सोपविण्यात आले आहे . चव्हाण बाबांच्या प्रामाणिकपणाला तोड नाही पण जिथे कलमाडींची ‘शेती’ आहे त्या शेतीत बाबांचे होणार कसे ? हा प्रश्न आहे. हर्षवर्धनजी तर इंदापूरचे.. शक्य आहे ते ते करतील… आणि विश्वजित चे देखील याहून निराळे नसेलच .या मुळे जो जो या पक्षाकडून उभा राहील त्याला त्याला आपापल्या बळावरच आपला सुभा निर्माण करावा लागणार आहे असे सांगण्यात येत आहे . म्हणजे काँग्रेस कडे नेतृत्वहीनता असेल . केवळ रमेश बागवे शहर अध्यक्षपदावर आहेत आणि बागवे एकमेव असतील ज्यांच्यावरच बऱ्यापैकी भीड असेल. ते एकटे त्यास किती पुरे पडणार ? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे .
दुसरीकडे पिंपरी महापालिकेबरोबर पुण्यातील आहे, ते वर्चस्व राष्ट्रवादीला कायम राखायचे आहे . एवढेच नव्हे तर भाजपची सगळीकडून कोंडी करायचे काम राष्ट्रवादीला करायचे आहे . या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शी आघाडी करेलच पण अन्य राजकीय हालचाली देखील जोरात करेल असे दिसते आहे . पुढच्या महिन्यापासून सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे दोघेही सातत्याने कार्यकर्त्यांमध्ये कसे राहतील याकडे लक्ष पुरविले जात आहे . तत्पूर्वी काही खाजगी गोपनीय बैठका घेण्यात येत असल्याचे वृत्त आहे . ज्यामध्ये २ ते ३ बैठकांना खुद्द शरद पवार हि उपस्थित राहू शकतील असे समजते आहे. एकंदरीत राष्ट्रवादीकडून हि निवडणूक प्रतिष्ठेची लढाई बनवली जाइल असे दिसते आहे .अजितदादा आणि सुप्रिया सुळे या दोघांनाही उमेदवारी वाटप करताना खुद्द शरद पवार यांच्याकडून हिरवा कंदील घेवूनच उमेदवार ठरवावे लागणार आहेत. मात्र यावेळी दादांबरोबर ताई देखील तेवढ्याच नव्हे तर जास्त हिरारीने रणांगणात उतरणार आहेत असा दावा केला जात आहे .