दिल्ली – 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींची 150 जयंती साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त भाजपचे सर्वच खासदार आप-आपल्या मतदार संघात 150 किमींची पदयात्रा करणार आहेत.याबाबतचे निर्देश आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या खासदारांना दिले आहेत. पंतप्रधानांच्या निर्देशानुसार, भाजप खासदार 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान आपली पदयात्रा करणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी बैठकीला संबोधित करताना खासदारांना हे निर्देश दिले आहेत. जोशींनी सांगितल्याप्रमाणे, लोकसभा सदस्यांप्रमाणेच राज्यसभा सदस्यांना सुद्धा प्रत्येकी एक-एक मतदार संघ दिला जाणार आहे. त्यामध्ये राज्यसभा सदस्यांना महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या संघर्षावर कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत.
प्रत्येक लोकसभा मतदार संघात तयार केले जाणार 15-20 पथक
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले, की प्रत्येक लोकसभा मतदार संघात 15-20 टीम नेमल्या जाणार आहेत. यामध्ये दररोज 15 किमी पदयात्रा काढली जाईल. या पदयात्रेत खासदार विविध ठिकाणी थांबून वृक्षारोपन करताना महात्मा गांधींचे विचार आणि त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यावर कार्यक्रमांमध्ये सुद्धा सहभाग घेतील. हे कार्यक्रम लागू करण्यासाठी पक्षीय स्तरावर समिती नेमली जाणार आहे. राज्यसभा आणि लोकसभा अशा दोन्ही सभागृहातील सदस्य या कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. मोदींच्या निर्देशानंतर विविध राज्यातील भाजप आमदारांनी सुद्धा अशा प्रकारची यात्रा सुरू केली आहे.