पुणे : रसिकलाल धारिवाल यांनी आपल्या कार्याने अपूर्व व्यावसायिक यश मिळवले. तसेच, सामाजिक बांधिलकी जपून समाज आणि देशासाठी योगदानही दिले. अशा या दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तीला त्यांच्या मित्रपरिवाराकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘आरएमडी अपूर्व राजयोगी’ या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.
जीतोच्या वतीने रसिकलाल धारिवाल यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील कार्याचे चित्रमय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विविध कला, राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात केलेले अतुलनीय कार्य चित्र स्वरूपात मांडण्यात आले होते. याप्रसंगी अँटी टेर्रोरिस्ट वर्ल्डचे मिठासिंग, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आचार्य चंद्रजी म.सा., श्रीमती शोभा धारिवाल, प्रकाश धारिवाल, आदित्य धारिवाल, जान्हवी धारिवाल, जीतो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी, महावीर प्रतिष्ठाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, शर्मिला ओसवाल, राजेश सांकला, अचल जैन, अजित सेठिया, अमित लुंकड, सचिन जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वतःसाठी जगणारे सगळेच असतात पण समाजासाठी जगणारा माणूस लाखात एक असतो. तसेच समाजासाठी जगणारे रसिकलाल धारिवाल होते. त्यांनी धर्म, समाज, राष्ट्रासाठी अमूल्य योगदान दिले. धारिवाल सारखे व्यक्ती असतील तर राष्ट्र कधीही मागे राहू शकत नाही, असे मिठासिंग म्हणाले.
रसिकलाल धारिवाल हे नाव फक्त पुणे किंवा भारत देशपुरते मर्यादित नाही. जगात त्यांची किर्ती आहे. ते तत्वनिष्ठ व्यक्ती होते. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची आपल्यावर जबाबदारी आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
कृष्णकुमार गोयल म्हणाले की, त्यांची मनाची श्रीमंती देखील अगणित होती. त्यांचा स्वभाव व त्यांची बुद्धी उचस्तरावर होती. नावाप्रमाणेच त्यांचे जीवन रसिकमय होते.
रसिकलाल धारिवाल यांच्या निधनाचे जैन समाजातील प्रत्येकाला खूप दुःख झाले आहे. रसिकशेठ प्रत्येक काम खूप विचारपूर्वक निर्णय घेऊन यशस्वी केले. जितोची खरी सुरुवात पुण्यामध्ये झाली ज्यामध्ये रसिकशेठ यांचा मोलाचा वाटा होता. जितो नेहमीच रसिकशेठ यांनी दाखविलेल्या मार्गावर चालेल, असे विजय भंडारी म्हणाले.
रसिकशेठ जैन समाजाची मोठी संपत्ती होते. त्यांच्या जाण्याने जैन समाजाची झालेली हानी भरुन काढणे शक्य नाही, अशा शब्दांत विजयकांत कोठारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पोपटलाल ओस्तवाल म्हणाले की, कोणत्याही संकटांना तोंड देणाची इच्छाशक्ती रसिकलाल धारिवाल यांच्यामध्ये होती. त्यांनी शून्यातून आयुष्याची सुरुवात केली आणि आपले आयुष्य यशस्वी केले. त्यांच्या जाण्याने जैन समाज पोरका झाला.
यावेळी रसिकलाल धारिवाल यांच्या जीवनावर आधारित ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अचल जैन यांनी केले. आभार अजित सेठिया यांनी मानले.