पुणे-ज्या बीआरटी ने पुण्यात कलमाडी आणि कॉंग्रेसची सत्ता महापालिकेतून उलथवून लावली ,नंतर राष्ट्रवादीला देखील विरोधी बाकावर आणले अशा बीआरटी प्रकरणी… निधी गेला तरी बेहत्तर पण पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटी नको अशी भूमिका चक्क सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पिंपरी महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी घेतली आहे. माणसी एकाहून अधिक खाजगी वाहने ज्या शहरात आहेत . अशा शहरात वाहतूक समस्येच्या नावाखाली,खाजगी वाहनांची कोंडी करून बीआरटी सारख्या योजना फक्त भ्रष्टाचारासाठी आणल्याचे आजतागायत पुण्यात तरी स्पष्ट झाले आहे . कित्येकदा बीआरटी तयार केली आणि उखडली , सायकल मार्ग हि तसेच वाहतूक समस्या हे भ्रष्टाचारासाठी कुरण मानून योजना आणल्या जात आहेत . अशा पार्श्वभूमीवर सीमा सावळे यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे .
पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षात काम करत असताना देखील पुणे-मुंबई महार्गावर बीआरटी करण्यास विरोध केला होता. त्याचे दोष दाखवून दिले होते. त्यामुळे मनुष्यहानी होऊ शकते, असे सांगितले होते. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी त्यावेळीही केली होती. सत्तेत असतानाही त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत.असे सीमा सावळे यांनी आज स्पष्ट केले .पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. सभेत पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी-दापोडी बीआरटीएसबाबत चर्चा झाली. त्यानंतर सावळे यांनी सभेतील माहिती पत्रकारांना दिली.
सीमा सावळे म्हणाल्या, ”महापालिका प्रशासन बीआरटी मार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना केल्याचा दावा करीत आहे. ही बाब चुकीची आहे. मर्ज इन आणि आऊट येथील उपाययोजना पुरेशा नाहीत. आयआयटीच्या सूचनांचे पूर्णपणे पालन झालेले नाही. तसेच दापोडी ते पिंपरीदरम्यानच रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. येथील प्रवास धोक्याचाच ठरणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्याचा घाट कशासाठी. प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्यास बीआरटी सुरू होऊ देणार नाही. वेळप्रसंगी निधी परत गेला तरी चालेल परंतु या मार्गावर बीआरटी झाली नाही पाहिजे. आयुक्त म्हणतात बीआरटीची जबाबदारी निश्चित करावी लागेल. मग सगळ्या प्रकल्पांची देखील जबाबदारी निश्चित केली पाहिजे” असे सावळे म्हणाल्या.