‘मागासांना प्रगतीची संधी मिळाली तरच देशाची प्रगती शक्य’ – न्या. पी. बी. सावंत
पुणे :
‘ज्यांना राखीव जागांचा लाभ मिळाला, त्यांनी उर्वरित मागासांसाठी स्वखुशीने राखीव जागा सोडाव्यात, असे आवाहन करतानाच मागासांना प्रगतीची संधी मिळाली, तरच देशालाही द्रुतगतीने प्रगती पथावर जाणे शक्य होईल,’ असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी आज केले.
सत्यशोधक प्रबोधन महासभा आयोजित ‘मंडलयुग राष्ट्रीय विचार’ परिषदेचे उद्घाटन करताना ते शनिवार दुपारी बोलत होते.
ओबीसी हिताच्या मंडल आयोग अंमलबजावणीच्या घटनेला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ही 2 दिवसीय परिषद आझम कॅम्पसच्या असेंब्ली सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन न्या. पी. बी. सावंत यांच्या भाषणाने झाले. व्यासपीठावर परिषदेचे स्वागताध्यक्ष पी. ए. इनामदार, महासभेच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी, जेएनयू (दिल्ली) मधील प्रा. दिलीप यादव, माळी महासंघनेते शंकरराव लिंगे, निमंत्रक किशोर ढमाले उपस्थित होते. प्राचार्य संजय घोडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
न्या. सावंत म्हणाले, ‘सर्व समाजाची प्रगती साधायची असेल, तर मागासांना न्याय देण्याची गती वाढवावी लागेल. आता मागास समाजाची मागासलेपणा सांगायची आणि एकमेकांत संघर्ष करण्याची स्पर्धा सुरू आहे. ही दुही होऊ नये म्हणून सर्व मागास समुहांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे.’
आरक्षणामुळे आता व्यक्ती आणि कुटुंबाची प्रगती होत असली, तरी त्यांना प्रगतीच्या संधी मिळाल्या. त्यांनी स्वखुशीने राखीव जागा उर्वरित मागासांसाठी सोडल्या पाहिजेत. संधी मिळाली, तर इतरांपेक्षा आपण राष्ट्र उभारणीत अधिक योगदान देऊ शकतो हे बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे मागासांच्या प्रगतीमधील अडथळे दूर केले पाहिजेत.
15 टक्के जनतेनेच प्रगती केल्याचे चित्र दिसत आहे. 85 टक्के मागास समूहांनीही प्रगती केली असती, तर देश सर्वोच्च ठिकाणी पोहोचला असता असेही ते म्हणाले.
स्वागताध्यक्ष पी. ए. इनामदार म्हणाले, ‘आरक्षणाच्या धोरणामुळे देशात विधायक बदल घडून आलेला आहे, तरीही अजून बराच बदल होणे बाकी आहे. तंत्रज्ञान आणि शिक्षणातील वेगवान बदलांमुळे ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातील दरी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मागास समुहांनी शिक्षणाबरोबर तंत्रज्ञानाच्या आधारे प्रगतीचा वेग वाढविला पाहिजे. न्यूनगंड बाजूला ठेवून सकारात्मक वाटचालीला या देशात नेहमीच वाव राहिलेला आहे.’
प्रा. प्रतिमा परदेशी म्हणाल्या, ‘आरक्षणामुळे कोणकोणत्या क्षेत्रात प्रगती झाली याचा आढावा घेऊन पुढील वाटचालीची दिशा या परिषदेत ठरणार आहे. बारा बलुतेदारांचे जागतिकीकरणात काय झाले याचा आढावा घेतानाच सत्यशोधक बुद्धिजीवी निर्माण करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.’
7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता अॅड. प्रकाश आंबेडकर आणि डॉ. सुहास पळशीकर यांच्या उपस्थितीत परिषदेच्या समारोपाचे सत्र होईल, आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण ठराव मांडले जातील.