माढा: मला न्याय देण्याचा अधिकार असता तर छगन भुजबळांबाबत वेगळा न्याय दिसला असता, असे विधान ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील अरण (ता. माढा) येथील माळी समाजाच्या मेळाव्यात बोलताना केले.दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनातील भाषणातून बोलताना अजित पवार यांनीही लवकरच भुजबळ परत येतील असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर त्यानंतर झालेल्या पंकजा मुंडे यांच्या भाषणातील काही वाक्यांनी भुजबळांच्या सुटकेबाबत संकेत मिळत आहेत कि काय ? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होऊ पाहतो आहे.
संत सावता माळी यांच्या जन्मगावी अरण येथे आज ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे यांनी सावता माळी यांचे दर्शन घेतले. आणि माळी समाज बांधवांचा मेळाव्यात भाषण केले . यावेळी बोलताना त्यांनी छगन भुजबळांना न्याय देण्याचा अधिकार असता तर त्यांच्या बाबतीत मी निश्चित दिला असता ,असे स्पष्ट केले. पंकज भुजबळ व माझे चांगले संबंध आहेत. त्यांना मदत केली आहे.भुजबळ साहेबांनी मला जेल मधून पत्र लिहिले आणि त्यांच्या मागणीनंतर तातडीने आपण निधी दिल्याचेही त्यांनी जाहीर सभेत सांगितले.
मेळाव्याच्या निमित्ताने सर्वच पक्षातील माळी समाजातील नेत्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळांचा राजकीय बळी घेतल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळांवरील आपले प्रेम व्यक्त करत त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. मंत्री मुंडे यांच्या उपस्थित झालेल्या या मेळाव्यात सरकारने छगन भुजबळांची सुटका करावी या मागणीचा हात उंचावून ठराव देखील केला. पंकजा मुंडे तुमची लेक आहे, मला तुम्ही दत्तक घ्या असे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यास आमदार अतुल सावे, मनिषा चौधरी, आयोजक कल्याण आखाडे, भास्कर अंबेकर, शंकर बोरकर, बाळासाहेब माळी आदी व्यासपाठीवर उपस्थित होते.