नवीदिल्ली-पंजाबचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचे पाकिस्तान प्रेम पुन्हा एकदा पाहण्यास मिळाले आहे. हिमाचल प्रदेशाली कसोली या ठिकाणी असलेल्या साहित्य उत्सवात सिद्धूंनी पाकिस्तानचे गोडवे गायले आहेत. पाकिस्तानचा माझा दौरा दक्षिण भारतातील दौऱ्यापेक्षा खूपच चांगला होता असे सिद्धूंनी म्हटले आहे. तुम्ही पाकिस्तानात कधीही जा.. तिथे भाषा, माणसं खाद्यसंस्कृती काहीही बदलत नाही. मात्र तुम्ही दक्षिण भारतात गेलात तर तिथे तुम्हाला इंग्रजी किंवा त्यांची भाषा शिकावी लागते. पाकिस्तानात असे काहीही नाही असे सिद्धू यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू गेले होते तेव्हा त्यांनी पाकचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. ही गळाभेट त्यांना चांगलीच भोवली कारण भारतातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. इतके सगळे होऊनही सिद्धू यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे गोडवे गायले आहेत.
पाकिस्तानचे लष्कर प्रमुखांच्या गळाभेटीबद्दल स्पष्टीकरण देताना सिद्धू म्हणाले होते की, ‘जनरल बाजवा यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले की, आम्हाला शांतता हवी आहे. यानंतर ते म्हणाले की, आम्ही गुरू नानक यांच्या ५५० व्या जयंतीवर करतारपुर प्रवास सुरू करण्याच्या विचारात आहोत.’ त्यांच्या या पाकिस्तान भेटीमुळे फार मोठा गदारोळ माजला होता. भाजपसह इतर अनेक पक्षांनी सिद्धू आणि पर्यायाने काँग्रेस यांना धारेवर धरले होते.