आळंदी-अंगामध्ये पांढरे शुभ्र वस्त्र , डोक्यावर फेटा किंवा टोपी , कपाळी केसरी गंध,गळ्यात तुळशीची माळ असा पेहराव असलेल्या लाखो वैष्णवांच्या आगमनाने अलंकापुरी गजबजून गेली होती . राज्यभरातून आलेल्या सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्यातील लाखो वारकरी माउलींच्या पालखीचे प्रस्थान सोहळ्यासाठी दाखल झाले होते . दिंड्या दिंड्यातील भजन , कीर्तन व प्रवचनाने अलंकापुरी भक्तिरसात चिंब झाली होती .
टाळ मृदुंगाचा गजर , विठ्ठल नामाचा जयघोष करीत भागवत धर्माची पताका उंचावत देश विदेशातून आलेल्या लाखो वैष्णवांसह कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलीनी आज ( मंगळवार ) सायंकाळी आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले .
मंगळवारी पहाटे सव्वा दोन वाजता माउलींच्या समाधी मंदिरात काकडा आरती,पवमान अभिषेक झाल्यानंतर पहाटे चार ते बारा वाजेपर्यंत माउलींचे समाधी दर्शन भाविकांना खुले ठेवण्यात आले होते . दरम्यानच्या काळात सकाळी नउ वाजेपर्यंत भाविकांच्या महापूजा करण्यात आल्या . नउ ते अकरा वीणा मंडपात किर्तनाची सेवा झाली . दुपारी बारा ते साडे बारा यावेळेत माउलींच्या नैवद्यासाठी दर्शनबारी बंद ठेवून समाधी मंदिराचा गाभारा स्वच्छ करुन महानैवद्य दाखविण्यात आला . दुपारी साडे बारा ते दोन माउलींच्या समाधीचे दर्शन सुरू ठेवण्यात आले होते . दुपारी एकनंतर मुख्य प्रस्थान कार्यक्रमासाठी देवूळवाड्याची स्वच्छता करण्यात आली . दुपारी दोन ते साडेतिनच्या सुमारास रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देवूळवाड्यात प्रवेश देण्यात आला . यावेळी एकेक करून चोपदार व पोलिसांच्या मदतीने दिंड्या देवूळवाड्यात सोडण्यात आल्या . दरम्यानच्या काळात माउलींच्या समाधीवर ब्रम्हवृंदाच्यावतीने पोशाख चढविण्यात आला . पोशाखानंतर गुरू हैबतबाबांच्यावतीने राजाभाऊ आरफळकर यांनी माउलींच्या समाधीची आरती केली . त्यानंतर संस्थानच्यावतीने प्रमुख विश्वस्थ ॲड विकास ढगे पाटील यांनी माऊलीची आरती केली . संस्थानच्या वतीने वीणामंडपातील उपस्थीत मानक-यांना नारळप्रसाद देण्यात आला .
आता लाखो वारकऱ्यांना माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याची ओढ लागली होती . सर्वांच्या नजरा कळसाकडे लागल्या होत्या . देउळवाड्यात टाळ मृदुंगाच्या साथीने वैष्णव माऊली नामात दंग झाले होते . दिंड्या दिंड्यात विविध खेळ रंगले होते आणि त्याच वेळी समाधी मंदिरात ” पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ” नामाचा जयघोष झाला कळस हलला , कळस हलला असा एकच गलका झाला आणि सायंकाळी साडेपाच वाजता माउलींच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान झाले . प्रमुख विश्वस्थ ॲड विकास ढगे पाटील व सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी माऊलींच्या पादुका प्रस्थानासाठी वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीत स्थानापन्न केल्या .यावेळी संस्थानतर्फे मानक-यांना पागोटे वाटप करण्यात आले . दिंडी प्रमुखांना गुरू हैबतबाबांच्यावतीने व माउलींच्या समाधीजवळ संस्थानतर्फे नारळ प्रसाद देण्यात आला .
माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या आळंदीकरांनी फुलांनी सजविलेल्या व माउली विराजमान झालेल्या पालखीला खांदा दिला आणि ” माऊली माऊली ” नामाचा जयघोष करीत पालखी वीणामंडपात अष्टदिशांना फिरविली . सायंकाळी ७ च्या सुमारास देवूळवाड्यातून ती बाहेर आणण्यात आली .पालखी देवूळवाड्यातून बाहेर पडल्यानंतर सोहळ्याच्या अग्रभागी माऊलीचा मोती अश्व व मागे स्वाराचा हिरा अश्व पुढे चालु लागले . त्यामागे २७ दिंड्या , पालखीत विराजमान झालेली व माहेरच्या ओढीने निघालेली माऊली व त्यामागे सुमारे ४०० दिंड्या अशा वैभवी लवाजम्यासह नगरप्रदक्षिणा करून रात्री आजोळघरी माऊली विसावली . आजोळघरी समाज आरती झाल्यानंतर जागर झाला . रात्रभर हजारो भाविकांनी माऊलीचे दर्शन घेतले .
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील , जिल्हा न्यायाधीश श्रीनिवास अगरवाल ,श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार , मालक बाळासाहेब आरफळकर , प्रमुख विश्वस्थ ॲड विकास ढगे पाटील , सोहळा प्रमुख योगेश देसाई , अभय टिळक ,डॉ अजित कुलकर्णी , माजी मंत्री बबनराव पाचपुते , खा संजय जाधव , नगराध्यक्षा वैजयंताताई उमरगेकर , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारती , माजी आ उल्हास पवार , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ ज्ञानेश्वर माऊली जळगावकर , ॲड माधवी निगडे , संभाजीराजे शिंदे , संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र पाटील ,व्यवस्थापक माऊली वीर यांच्या मानकरी , दिंडीकरी , फडकरी उपस्थित होते .
पाच लाखाचा धनादेश
आज प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता दुष्काळ निधीसाठी पाच लाखाचा धनादेश सोहळा प्रमुख योगेश देसाई यांचे हस्ते ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला .