पुणे-चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी केंद्राकडून निधी दिला आहे, उड्डाण पुलाचा आराखडा तयार आहे, कामासाठी ठेकेदार तयार आहे, मात्र महापालिकेने भूसंपादन केले नसल्याने काम अद्यापही सुरू झालेले नाही. उड्डाण पुलाचे उद्घाटन होऊनही काम सुरू न झाल्याबाबत माध्यमांमधून मला विचारणा होत असून, पुणे महापालिकेमुळे माझी बदनामी होत आहे, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी महापालिकेच्या कारभारावर कठोर टीका केली. चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी तातडीने भूसंपादन करण्याचे आदेशही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
जिल्ह्यतील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत गडकरी बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, अमर साबळे, वंदना चव्हाण, शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आशिषकुमार सिंह, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त सौरव राव, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गीते आदींसह विधीमंडळ सदस्य, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
चांदणी चौकात होणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रश्?न सोडवण्यासाठी पालिकेकडून उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाचे काम सुरू झाल्यानंतर पर्यायी रस्त्यासाठी अडथळा ठरणा?ऱ्या जागा ताब्यात घेण्याचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे. उड्डाण पुलाच्या कामासाठी पंधरा हेक्टर जागेची आवश्यकता असून त्यातील सात हेक्टर जागा बीडीपीतील आहे. इतर जागांवर ८८ घरे, दोन इमारती आणि एक बंगला अशी सुमारे शंभर रहिवासी घरे आहेत. भूसंपादनापोटी रोख मोबदला देण्यासाठी दीडशे कोटींची आवश्यकता असल्याचा अंदाज पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. ही जागा रस्त्यासाठी घेतली जाणार असल्याने जागेपोटी टीडीआर देण्याची तरतूद आहे. मात्र, घरांचा आकार लहान असल्याने आणि नागरिक टीडीआर घेऊ न काय करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच बाजारात मंदी असल्याने टीडीआरसाठी प्रकल्पबाधित पुढाकार घेत नसल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. परिणामी, प्रकल्पबाधितांना जागेचा मोबदला चालू बाजार मूल्य तक्त्यानुसार (रेडीरेकनर) दुप्पट दराने रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बीडीपीच्या जागांसाठी मोबदला कसा द्यायचा, अशी समस्या आहे. ‘उड्डाण पुलासाठी निधीचे वर्गीकरण झाले आहे. तसेच प्रकल्पबाधित नागरिक स्थलांतर करण्यास तयार असूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच अनेक वेळा मुदतवाढ देऊनही महापालिकेच्या वतीने जागा संपादन करण्यास विलंब होत आहे. उड्डाण पुलाच्या कामाला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष असून नकारात्मक चर्चा सुरू झाली आहे,’ असे आमदार मेधा कुलकर्णी यांनी बैठकीत सांगितले.
उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन २७ ऑगस्ट २०१७ रोजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. पुलाचे काम सहा महिन्यांत सुरू केले जाईल, असे आश्वासन त्या वेळी गडकरी यांनी दिले होते, मात्र अद्यापही काम सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, पालिकेने भूसंपादन केले नसल्याने पुलाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे तातडीने भूसंपादन करावे.
फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणामार्फत विविध ठिकाणी महामार्गांचे काम गतीने सुरु आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही भूसंपादनाच्या अडचणीमुळे ही प्रक्रिया संथ झाली आहे. त्यामुळे विविध यंत्रणांनी यासंदर्भात एकत्रितपणे काम करावे आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग द्यावा. त्या अनुषंगाने आवश्यक ते निर्देश राज्य शासनाने यापूर्वीच जारी केले असल्याचे त्यांनी सांगितले.