सातारा:
“मी राष्ट्रवादी, “मी साहेबां सोबत’ तसेच “मी शरद पवार’ असे लिहिलेल्या टोप्या घालून “एकच नेता एकच आवाज शरद पवार… शरद पवार’ असा शरद पवार यांचा जयघोष करणाऱ्या हजारो युवकांनी हलगी पासून ढोल ताश्यांपर्यंतच्या वाद्यांचा गजरात काढलेल्या रॅलीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज (रविवार) साताऱ्यात जोरदार स्वागत करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या उघड्या जीपमधून पवार हे विराजमान झाले. हजारो युवकांच्या समवेत पोवई नाका येथे रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी “” तो पत्ता करतो गुल..आमचा नेता पॉवर फुल्ल’ या गीतावर युवकांनी सतत ठेक्यावर नाच सुरु ठेवत शरद पवार यांच्यासमवेतच आम्ही खंबीरपणे आहोत अशी ग्वाही दिली.
स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशकडूनभारतावर हल्ले झाले. साताऱ्यातील जवानांनी हे हल्ले परतवून लावले. महाराष्ट्र घडवणारे यशवंतराव चव्हाणही याच मातीतले आहेत. त्यामुळे हा जिल्हा विचारांशी कधीच प्रतारणा करणार नाही, असं सांगतानाच ज्यांनी विचारांशी प्रतारणा केली त्याला धडा शिकवा, असं आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना पराभूत करण्याचा अप्रत्यक्ष इशाराही दिला. तसेच विधानसभाच नव्हे तर साताऱ्याची लोकसभेची जागाही जिंकायची आहे. कामाला लागा आणि विजयानंतर गुलाल उधळायला बोलवा, असंही पवार म्हणाले. भोसले यांच्यावर शरसंधान साधलं. विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकविण्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. ज्यांनी विचारांशी प्रतारणा केली, त्यांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, असं सांगतानाच ज्यांच्या हातात सत्ता आहे ते शेतकऱ्यांना कवडीची किंमत देत नाहीत. काळ्या आईशी इमान राखणाऱ्यांना जर हे मदत करत नसतील तर यांना सत्तेतून खाली खेचण्याची गरज आहे, असं पवार म्हणाले. मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. आम्ही तरुणांच्यापाठी ताकद उभी करावी, असं लोकांचं मत आहे. त्यामुळे आम्ही तरुणांच्या पाठी ताकद उभी करणार! मी २० तास काम करेल, पण चुकीच्या लोकांच्या हातात महाराष्ट्र जाऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. स्वाभिमानाचा इतिहास कुठाय?
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा इतिहास निर्माण केला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज दिल्लीला गेले. पण औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा उचित सन्मान केला गेला नाही. महाराज तिथून परत आले. त्यामुळे त्यांना आग्र्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले. मात्र महाराजांनी परत येऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि आता…?, असा सवाल करत उदयनराजेंनी स्वाभिमान गहाण टाकल्याचा टोलाही त्यांनी लगावला.