नाठाळ बैलांना मतदानाच्या दिवशी बाजार दाखवा: पवार
जालना: एकदा काय उन्हाळा आला तर पक्षबदलूंनी पळापळी सुरू केली आहे. या साऱ्यांचा विकास आपण मिळून करू. जास्त दिवस राहिले नाहीत, असं सांगतानाच बैलजोडीत काही बैलं नाठाळ असतात. नांगरणी करताना काही बैल वाकडे चालतात. मग आपण त्यांच्या जागेची अदलाबदल करतो. तरी तो नाठाळ बैल तसाच वागला तर त्याला आठवड्याचा बाजार दाखवतो. आज हे बैल तसेच झाले आहेत. मतदानाच्या दिवशी यांना बाजार दाखवा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच गडचिरोलीत पूर आला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत व्यस्त आहेत. त्यांना रात्री झोप तरी कशी लागते? असा सवालही पवारांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने जालना येथ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका करतानाच भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल चिंताही व्यक्त केली. काहीजण आज पक्ष सोडून जात आहेत. मराठवाड्यातील काही नेते सोडून गेले आहेत. आम्हाला विकास करायचा आहे, असं म्हणत हे पक्षांतर सुरू आहे. अरे, तुम्हाला इतकी वर्षे सत्ता दिली तेव्हा काय केले? या जनतेने मोठे केले, पक्षाने हवे ते दिले. तरी गद्दारी करता?, असा सवाल करतानाच आजचा तरूण शांत आहे. उद्या ही तरूण मंडळी संतप्त झाली तर हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा पवारांनी दिला.