बालशिक्षण विषयक राष्ट्रीय धोरणावर काम करण्याची गरज : खासदार वंदना चव्हाण
पुणे :
‘बालकांचे शिक्षण आणि बालशिक्षणातील दरी अशा अनेक विषयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विधायक आणि कालानुरूप बदल होण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील संस्था-संघटनांनी काम करण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी केले.
‘अर्ली चाईल्डहूड असोसिएशन’(इंडिया)च्या पुणे विभागाने आयोजित ‘लीडरशीप अॅण्ड ग्लोबल प्रॅक्टीसेस इन चाईल्डहूड एज्युकेशन’ या परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. हॉटल ‘सन अॅण्ड सँड’ येथे ही परिषद झाली. दीपप्रज्वलन प्रसंगी स्वाती पोपट-वत्स (अध्यक्ष, पोदार एज्युकेशन नेटवर्क), आदीत्य तापडीया, मन्सूर विरानी (‘अर्ली चाईल्डहूड असोसिएशन, पुणे विभाग प्रमुख), मसरत तवावाला, डॉ. अंकीता संघवी उपस्थित होते.
अॅड. वंदना चव्हाण बोलताना म्हणाल्या, ‘कोपन हेगन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ठरलेली मिलेनियम विकास उद्दिष्टे 2030 सालापर्यंत पूर्ण करायची आहेत. त्यामध्ये शिक्षणाची प्रगती हे मुख्य उद्दिष्टे आहे, बाल शिक्षणाची व्यवस्था सुधारल्याशिवाय हे जागतिक उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. बालशिक्षण क्षेत्रात अनेक समस्या, दरी आहे. अल्पवयीन मुलींचे विवाह पुण्यासारख्या शहरातही होत आहेत. अशा वेळी बालकांचे शिक्षण नीट पूर्ण व्हावे आणि त्यांना पुढील शिक्षणाचीही संधी मिळावी, यासाठी या क्षेत्रात काम करणार्या संस्था, संघटनांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणात विधायक आणि कालानुरूप बदल व्हावेत, यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. ‘अल्पवयीन मुलांना न्याय’ देण्यासंबंधी संसदीय समितीची सदस्य या नात्याने मी या संस्थांना मदत करेन.’
‘सर्वांपर्यंत शिक्षण’ हे महत्त्वाचे मिशन आहे, आणि अनेक सामाजिक समस्या शिक्षणाच्या अभावी निर्माण होत आहेत. त्यामुळे बालकांच्या शिक्षणासाठी जनजागृतीही महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.
पुण्यातील प्री-स्कूल, स्कूल, बालवाड्यांच्या क्षेत्रात चांगले काम करणार्या प्राचार्यांचा सन्मान खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात नलिनी सेनगुप्ता, डॉ. ओलीव मॅथ्यूज, माधवी वडगांवकर, उत्कर्ष केणी, भावना शहा, सीमा कापसे, वैशाली बहागत, अपर्णा दास, संदीप खन्ना यांचा समावेश होता.
यावेळी बीजभाषण करताना स्वाती पोपट-वत्स (अध्यक्ष, पोदार एज्युकेशन नेटवर्क) म्हणाल्या, ‘एकूण लोकसंख्येत बालकांचे प्रमाण 25 टक्के असले, तरी भविष्यातील ते 100 टक्के नागरिक आहेत, हे लक्षात घेऊन या क्षेत्रातील गुंतवणूक वाढली पाहिजे. शिक्षकांप्रती आदर वाढला पाहिजे. बालकांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या पाहिजे. प्री-स्कूलमध्ये त्यांना अभ्यासाच्या जाचाऐवजी आनंददायी खेळ खेळता आले पाहिजेत. चार ते सहा वयोगटातील बालकांवर अभ्यासाचे ओझे टाकणे चुकीचे आहे. बालकांचे शिक्षण या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.’ त्याचबरोबर पालकांनाही जबाबदार पालकत्वाचे प्रशिक्षणाची व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.’
परिषदेच्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी उमा बापट यांनी ‘आपल्या शाळेला समजून घ्या’ या विषयावर मार्गदर्शन केले.
‘प्री-स्कूल शिक्षणाची सद्यस्थिती’ या विषयावर चर्चासत्र झाले. यामध्ये नलिनी सेनगुप्ता (‘विद्या व्हॅली स्कूल’च्या मुख्याध्यापक), रूची आगरवाल (अमन सेतू शाळेच्या मुख्याध्यापक), डॉ. भूषण शुक्ला (मानसोपचारतज्ज्ञ), नंदकुमार काकिर्डे (‘भारती विद्याभवन’चे संचालक) हे सहभागी झाले होते.
अधिक माहितीसाठी www.eca-India.org ही वेबसाईट आहे.