पुणे-केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार येऊन चार वर्षांचा काळ झाला. मात्र, या चार वर्षांत सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत. या काळात सरकारच्या १६ मंत्र्यांनी तब्बल ९० हजार कोटींचा घोटाळा केला आहे. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. याच घोटाळ्यांमध्ये आमच्या बहिणीनेही चिक्कीत पैसे खाल्ले, आणि पुण्याच्या बापटांचा तूर घोटाळा प्रकरणी आता कॅग चा हि अहवाल आला आहे .अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे कालच एका कार्यक्रमात तब्बल ६ वर्षांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची गळाभेट झाली होती.
पुण्यात आयोजित राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,दीपक मानकर, प्रकाश कदम आदी उपस्थित होते. मुंडे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येऊन चार वर्षांचा काळ झाला. या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्नांकडे भाजपाचे लक्ष नसून त्यांचे मंत्री भ्रष्टाचारात मग्न आहेत. राज्यातील भाजपच्या १६ मंत्र्यानी ९० हजार कोटींचे घोटाळे केले. पण त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणतीही कारवाई केली नाही. तर उलट त्यांना काही तासात क्लीनचीट देण्याचेच काम केले आहे. या भाजपच्या मंत्र्यानी चिक्कीपासून उंदरांपर्यँत घोटाळा केला आहे. या घोटाळयामध्ये आमच्या बहिणीनेही चिक्कीत पैसे खाल्ले, असे सांगत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली.मुंडे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने जेवढी आश्वसने दिली त्यातील एकही पूर्ण झालेले नाही. भाजप सरकार सत्तेमध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे हे लोक तरुणांना वर्षाला दीड कोटी रोजगार देणार होते. या घोषणेमुळे तरुणाईने भाजपाला मतदान केले. मात्र, आजअखेर किती रोजगार मिळाले याची आकडेवारी यांच्याकडे नाही.
ज्या शहीद राजगुरू यांनी देशासाठी प्राण दिले ते संघाचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही दुर्देवी बाब असून बरं झाले संघ १६ व्या शतकात नव्हता. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज देखील संघाचेच होते असे बोलण्यासही ते विसरले नसते, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर त्यांनी टीका केली.