नागपूर: गेल्या काही दिवसांपासून घामटा काढणाऱ्या उष्णतेतून आज नागपूरकरांना थोडासा दिलासा मिळाला. आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नागपूरला झोडपले. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर इतका होता. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे काही मिनिटातचं नागपुरातील जनजीवन विस्कळीत झाले.
हवामान खात्यानेही विदर्भात केव्हाही अवकाळी पाऊस येऊ शकतो असा अंदाज वर्तवला होता. दुपारनंतर नागपुरातील वातावरण अचानक बदललं. हवेत गारवा निर्माण झाला. संध्याकाळी प्रचंड वेगाने वारे वाहू लागले आणि पावसाला जोरदार सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. विशेषत: ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागल्याने छोटे दुकानदार आणि पादचाऱ्यांची एकच धांदल उडाली. सुमारे दीड तास वादळी पावसाचे थैमान कायम होते. त्यानंतर मात्र वादळी पावसाचा वेग कमी झाला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागत सोहोळ्यासाठी रेशीमबाग मैदान सज्ज होत असतानाच यासाठी तयार करण्यात आलेला मंडप वादळामुळे उडून गेला. तर ध्वनीयंत्रणा देखील पडली. वाऱ्याचा वेग इतका होता की एलएडी वॉलदेखील पडली. तर प्रभाग क्रमांक १७ येथे विजेचा खांब कोसळला असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अनेक ठिकाणी वृक्षही उन्मळून पडली आहेत.
नागपूरमध्ये अवघ्या २४ तासात तापमानात दीड अंश सेल्सिअसने वाढ होऊन पारा शुक्रवारी ४६.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. शनिवारी त्याच वाढलेल्या तापमानावर वादळी पावसाने फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. तापमान तब्बल २.७ अंश सेल्सिअसने कमी होत पारा ४३.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेला हा गारवा कायमस्वरुपी नाही तर उकाडा वाढवणारा आहे, अशीच प्रतिक्रिया यावेळी वादळी पावसाचे थैमान अनुभवणाऱ्यांची होती. सुमारे दीड तास वादळी पावसाचे थैमान कायम होते. त्यानंतर मात्र वादळी पावसाचा वेग कमी झाला. गडकरी यांच्या स्वागत सोहोळ्यासाठी रेशीमबाग मैदान सज्ज होत असतानाच यासाठी तयार करण्यात आलेला मंडप वादळामुळे उडून गेले. तर ध्वनीयंत्रणा देखील पडली. वाऱ्याचा वेग इतका होता की एलएडी वॉलदेखील पडली. तर प्रभाग क्रमांक १७ येथे विजेचा खांब कोसळला असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.