मुंबई- मागील अनेक दिवसांपासून प्रचंड वाट पाहायला लावणारा मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सून सध्या कोकणात दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टी परिसरात पाऊस बरसत आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.दक्षिण पश्चिम मॉन्सून २०१९ चे कोंकण व गोव्यात आगमन झाले आहेत. येणाऱ्या २४ तासात, रत्नागिरी आणि कोल्हापूर मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षा आहे. मुंबई मध्ये २३ जून पर्येंत हलका पाऊस पडत राहणे अपेक्षित आहे.
आनंदाची बाब म्हणजे येत्या आठवडाभरात राज्यात जोरदार पाऊस बरसणार आहे. त्यातल्या त्यात दुष्काळी मराठवाड्यात 23 आणि 24 जून रोजी जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी आणि दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, स्कायमेटनेही येत्या 24 ते 48 तासात दक्षिण कोकण, गोव्यात पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे.
येत्या दोन दिवसात मराठवाडा, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल. मुंबईतही जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून आल्यानंतर आठवडाभर पावसाचा जोर कायम राहील. मराठवाडा, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात 23 आणि 24 जून रोजी जोरात पाऊस होईल. तर उत्तर महाराष्ट्रातही नाशिक, धुळे, जळगाव या भागात पाऊस बरसेल. याशिवाय विदर्भात 21-22 जूनला पाऊस पडण्याचा अंदाज आहे.