मुंबई / कोल्हापूर. ( शाहरुख मुलाणी ) – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात आज रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटण्याच्या निषेधार्थ जबाबदार सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधित खात्याच्या मंत्र्यांवर कारवाई व्हावी याकरिता निवेदन देण्यात आले.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला काही वर्षापासून तडे गेले होते स्थानिकांनी त्यासंबंधी विभागाला अनेक वेळा निवेदने देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती.परंतु या सरकारच्या दुर्लक्षपणामुळे धरण फुटून आज निष्पाप 23 जणांचा बळी गेला.शासनाला या गोष्टीचे गांभीर्य तर नाहीच तर उलट जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री तानाजी सावंत बेताल वक्तव्य करत आहे. खेकड्यांमुळे धरण फुटले हे सांगून अंगकाढूपणा सरकार करत आहे. खेकड्यांवर आरोप करून हे प्रश्न सुटणार नाही. खेकड्यांनी हे धरण फोडले असा आरोप संबंधित मंत्री व अधिकारी करत असतील तर त्या खेकड्यांवर कलम 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. हे आंदोलन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी रविकांत वर्पे, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी डॉ. शैलेश मोहिते, अदिल फरास, बाळासाहेब महामूनकर, रोहित पाटील, महेंद्र चव्हाण, राकेशजी कामठे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस स्टेशनमध्ये आरोपी म्हणून आणले ‘खेकडे’ राष्ट्रवादीचे ठाण्यात आंदोलन
राज्याचे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरणाच्या संदर्भात केलेल्या विधानाचे वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत. या विधानाच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नेतृत्वात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये चक्क खेकडे आरोपी म्हणून आणले. या खेकड्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटले, या वक्तव्यावर असा जावई शोध करणारे हे सरकार बेशरम आणि असंवेदनशील असल्याची खोचक टीका आमदार आव्हाड यांनी केली. शिवाय खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण धोकादायक झाले, या विधानाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खेकडे म्हणून आरोपी हजर केले. असे वक्तव्य मंत्री कसे काय करू शकतात, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला. अनेक नागरिकांचा जीव गेल्यानंतरही असे वक्तव्य करून या सरकारने असंवेदनशीलता दाखवली असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.