नव्या भारताच्या निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – भाजपा प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध नवा भारत घडविण्यासाठी बळ देणारा केंद्रीय अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली. त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले.
यावेळी दानवे पाटील म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सची बनवून प्रमुख जागतिक आर्थिक शक्ती बनविण्यासाठी अनेक धोरणात्मक उपाय या अर्थसंकल्पात आहेत. देश समृद्धीकडे वाटचाल करत असताना त्यामध्ये गाव, गरीब, महिला, युवा, शेतकरी, मध्यमवर्गीय, छोटे व्यापारी, लघु उद्योजक या सर्वांना महत्त्वाचे स्थान असेल, याचीही काळजी घेण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस आहे. आगामी पाच वर्षांत कोणीही नागरिक घर, पिण्याचे पाणी, वीज, गॅस कनेक्शन, शौचालय अशा सुविधांपासून वंचित राहणार नाही यासाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागासाठी चांगले रस्ते, वीज पुरवठा, शेतमालासाठी बाजारपेठेची उपलब्धता व्हावी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी अर्थसंकल्पात तरतूद आहे. महिला बचत गटांना सवलतीच्या दरात कर्ज आणि सदस्यांना ओव्हरड्राफ्टची सुविधा अशी विशेष तरतूद आहे. युवकांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि उद्योगधंद्यांचा विकास होऊन रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी मेक इन इंडियाला चालना देण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन या अर्थसंकल्पात पूर्ण करण्यात आले आहे.