मुंबई- महाराष्ट्रात धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याची मागणी तीव्र होत असताना, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता धनगर समाजाला अनुसूचित जमातींमधील सर्व सवलती लागू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारने डिसेंबरमध्ये याबाबत घोषणा केली होती, त्याचे आथा निर्णयात रुपांतर केले आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना 22 योजना दिल्या जातात, त्या आता धनगर समाजातील नागरिकांनाही लागू होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला.
महाराष्ट्रात सध्या धनगर समाजाला NT अंतर्गत आरक्षण आहे. पण धनगर समाजाने अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. पण धनगर आरक्षणाचा मुद्दा हा राज्याच्या नाही तर केंद्राच्या अखत्यारित येतो. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी धनगर समाजाने सातत्याने केली. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले होते, पण त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपत आला तरी धनगरांना अनुसूचित जमातीमधील आरक्षण मिळाले नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारने धनगर समाजाला थेट आरक्षण जाहीर न करता, अनुसूचित जमातीमध्ये मिळणाऱ्या सुविधा देऊ केल्या आहेत.