पुणे. दि. 05 : थकीत देयकांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी सुरु असलेल्या महावितरणच्या ‘नवप्रकाश’ योजनेत गेल्या महिन्याभरात पश्चिम महाराष्ट्रातील 30 हजार 78 थकबाकीदारांनी 10 कोटी 62 लाख रुपयांचा भरणा करून सहभाग नोंदविला आहे. या योजनेत थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांच्या मागणीनुसार नवीन वीजजोडणी कोणतेही शुल्क न भरता देण्यात येत आहे.
महावितरणने कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या लघु व उच्चदाब थकबाकीदार ग्राहकांसाठी नोव्हेंबर महिन्यापासून ‘नवप्रकाश’ योजना सुरु केली आहे. येत्या एप्रिल 2017पर्यंत मुदत असलेल्या या योजनेतून थकबाकीमुक्तीची व निशुल्क नवीन वीजजोडणीची संधी थकबाकीदारांसाठी उपलब्ध झालेली आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यातील 30 हजार 78 वीजग्राहकांनी गेल्या डिसेंबरमध्ये या योजनेत सहभाग नोंदविलेला आहे. या थकबाकीदारांनी मूळ थकबाकीपोटी 10 कोटी 62 लाख रुपयांचा भरणा केला असून योजनेला प्रतिसाद वाढत आहे. यात (कंसात भरलेली थकबाकी) पुणे जिल्ह्यातील 12,793 (5 कोटी 72 लाख रुपये), सातारा- 3182 (56 लाख रुपये), सोलापूर – 7999 (3 कोटी 24 लाख रुपये), कोल्हापूर- 3111 (59 लाख 83 हजार रुपये) व सांगली जिल्ह्यातील 2993 (50 लाख 58 हजार रुपये) थकबाकीदारांचा समावेश आहे.
‘नवप्रकाश’ योजनेत येत्या 31 जानेवारी 2017 पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ करण्यात येईल. तसेच दि. 1 फेब्रुवारी 2017 ते 30 एप्रिल 2017 पर्यंत मूळ थकबाकीसोबत 25 टक्के व्याजाच्या रकमेचा भरणा करावा लागणार असून उर्वरित 75 टक्के व्याज व 100 टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे.
मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर संबंधीत थकबाकीदार ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर थकबाकी भरण्याची ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. तसेच थकबाकीची रक्कम रोखीसह धनादेशद्वारेही रक्कम स्वीकारली जाणार आहे.
‘नवप्रकाश’ योजनेत सहभागी होण्यासाठी मूळ थकबाकीची 2 टक्के रक्कम भरण्याची अट रद्द करण्यात आली आहे. थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरीत नवीन वीजजोडणी देण्यात येईल. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हीस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येणार आहे. थकीत देयकांमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांनी थकबाकीमुक्त होण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा व नजिकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.